सातारा जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्यांसाठी लागणारी खते, बी-बियाणे शासनाकडून पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या बांधांवर खत-बियाणे देणे सुरू आहे. सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उंब्रज मंडळातील निगडी येथे शिवारात खत, बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
करोनामुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. विकसित राष्ट्रांनाही याची प्रचंड किंमत मोजावी लागली. आर्थिक हानीबरोबर मोठी मनुष्यहानी जगभरात झाली. भारतातही करोना संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन जाहीर केले. राज्यानेही लॉकडाऊन केले. लोकांनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे अर्थचक्र थांबले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी क्षेत्र मात्र या निर्बंधापासून दूर ठेवले होते. त्यामुळे रोज हजारो क्विंटल भाज्याची आवक बाजारात होत होती. लोकांच्या दारापर्यंत जात होत्या. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत खंड नव्हता. या काळात खरीपाच्या पेरण्यांसाठी लागणारी खते, बी-बियाणे पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील होते. याचाच भाग म्हणून पालकमंत्री बाळासाहेब पाटील उंब्रज मंडळातील निगडी येथे शिवारात जाऊन खते व बियाणे वाटप केले.
खरीपाची तयारी
मार्च-एप्रिल हा राज्यात खरीप पेरणीपूर्व मशागतीचा काळ. या काळात शेती संबंधित बाबींना सूट देण्यात आली. शासनाने खते-बियाणे शेतीच्या बांधांपर्यत पोहोचविण्याची व्यवस्था केली. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी एक लाख दोन हजार 923 मेट्रिक टन खत पुरवठ्यास मंजुरी देण्यात आली आहे. 59 हजार 943 मेट्रिक टन खताची उपलब्धता जिल्ह्यात होती. त्यापैकी 47 हजार 173 मेट्रिक टन विक्री झाली असून बाजारात 25 हजार 857 मेट्रिक टन खताची उपलब्धता आहे. सोयाबीन, भात, मका आणि ज्वारी या पिकांच्या बियाणांची जिल्ह्याची मागणी 47 हजार 804 क्विंटल होती. 11 हजार 309 क्विंटल बियाणांची उपलब्धता होती. त्यापैकी चार हजार 662 क्विंटल बियाणे विकले गेले. सहा हजार 946 क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांच्या बांधांवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यत बी-बियाणे पोहोचवू, असे सांगितले होते. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार 933 गटांमार्फत चार हजार 673 मेट्रिक टन खत आणि एक हजार 975 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बाधांवर पोहोचविण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली.