देहूगाव – आषाढी वारीनिमित्त दरवर्षीप्रमाणे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. 12) दुपारी अडीचच्या सुमारास प्रस्थान ठेवले. प्रथमच मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून पालखीने भक्तिमय वातावरणात प्रस्थान ठेवले. मंदिर आवारातील प्रसन्न वातावरणात उपस्थित भाविक टाळ, मृदंगाच्या निनादात तल्लीन झाले होते. मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी भजनी मंडपात विसावली. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देहूगावमध्ये पालखीचे प्रस्थान असल्याने मुख्य मंदिर, परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पालखी सोहळ्याची, वारीची परंपरा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केली. यंदा वारीचे 335 वे वर्ष आहे. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासून संस्थान, उपस्थित वारकऱ्यांची लगबग सुरू होती. चांदीचा पालखी रथ, पालखी, मंदिर गाभारा, दरवाजे, दीपमाळ रंगीबेरंगी फुलांनी सजवले होते. मंदिर आवारात, आवाराबाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळचा सूर्य माथ्यावर येऊ लागला तसतसा वातावरणात उष्मा जाणवू लागला. मात्र, दुपारनंतर हवामान ढगाळ झाले होते. त्यामुळे वारकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला.
परंपरेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे चार वाजता काकडा, पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिराची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विश्वस्त विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पहाटे साडेपाच वाजता वैकुंठगमन मंदिर व सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधीची संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
मोजक्याच वारकऱ्यांसह केवळ एक महिला डोक्यावर तुळशी घेऊन मुखी हरिनामासह “ज्ञानोबा-तुकाराम’ हा जयघोष करीत या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. चोपदाराने दंड उंचावताच आणि शिंगाड्याचा आवाज होताच परिसरात उपस्थितांनी मृदंग, टाळ, विणा यांचा निनाद केला. भजनी मंडपात दुपारी अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची विधिवत पूजा पुजारी नारायण अत्रे यांनी पृथ्वी, वायू, अग्नी, जल, आकाश यांसह पाद्य पूजा व कलश पूजा केली. प्रथम श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, ज्येष्ठ वारकरी विक्रम महाराज माळवे यांच्या हस्ते करण्यात आली. पादुकांची विधिवत पूजा व आरती झाल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते पादुका फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या.
सेवेकरी तानाजी कळमकर, गुंडाप्पा कांबळे, नामदेव भिंगारदिवे, अनिल गायकवाड, नामदेव पवार यांच्यासह भाविकांनीही पालखीला खांद्यावर घेत साडेतीनच्या सुमारास भजनी मंडपातून बाहेर आणली. तुतारीधारक (शिंगाडा) पोपट तांबे यांनी तुतारी फुंकली. उपस्थित वारकऱ्यांनी एकच जल्लोष करीत “ज्ञानोबा-माऊली तुकाराम’ असा जयघोष करण्यास सुरुवात केली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन
वारकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत तोंडाला मास्क लावले होते. सालाबादप्रमाणे मंदिर परिसरात गर्दी नव्हती; परंतु “भाविकांची काळजी हीच ईश्वर सेवा’ या भावनेने भाविकांनी एकत्र येऊ नये, यासाठी भाविकांना व ग्रामस्थांना मंदिर परिसरात प्रतिबंध करण्यात आला होता. पवित्र इंद्रायणी नदी संथ गतीने दुथडी भरून वाहत होती. गावाच्या सीमेवर नाकाबंदी केल्याने परगावातील कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. गेल्या 68 वर्षांत पहिल्यांदाच केवळ मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीने प्रस्थान ठेवले. ज्यांना येथे उपस्थित राहण्याचे भाग्य प्राप्त झाले, त्यांच्या चेहऱ्यावर पराकोटीचा आनंद दिसून येत होता.
शासनाने घालून दिलेल्या आदेशाचे पालन करीत प्रतिकूल परिस्थितीत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होत आहे. केवळ परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाने बस किंवा शक्य झाल्यास हेलिकॉप्टरने पालखी पंढरपूरला नेण्याबाबत विचार केला आहे. गेल्या वर्षभरात राज्यावर महापूर, करोना व निसर्ग चक्रीवादळासारखी संकटे आली. राज्यशासन याला खंबीरपणे तोंड देत आहे. राज्यावर आलेले हे संकट लवकरात लवकर दूर करावे आणि बळीराजासह सर्वसामान्य जनतेला या संकटातून बाहेर काढावे, असे साकडे श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी घातले.
– श्रीरंग बारणे, खासदार
देशासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकार राज्यातील सर्व संस्थाने, विश्वस्त व प्रशासन, साधू-संतांच्या विचारांना व वारकरी संप्रदायाला गालबोट लागू नये यासाठी लाखो वारकरी भाविकांनी घरी राहण्याचा घेतलेला निर्णय व पालखी प्रस्थान केवळ 50 लोकांमध्येच पार पडणे ही बाब समाज हिताचीच आहे. कोविड-19 पासून दूर राहण्यासाठी व भाविकांच्या संरक्षणासाठीच शासनाने हा निर्णय घेतला आहे.
– सुनील शेळके, आमदार