राष्ट्रवादीने ठाण्यात हाती घेतली स्वाक्षरी मोहीम
ठाणे :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करावा, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढे केली आहे. त्या मागणीच्या समर्थनार्थ ठाण्यात स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी सोमवारी अवघ्या 3 तासांत 9 हजार 720 जणांनी पवार यांच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला
. माजी केंद्रीय मंत्री पवार पाच दशकांपेक्षा अधिक काळ राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत. राजकीय मुत्सद्देगिरीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना आदराची वागणूक दिली जाते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारावेळी आणि निकालानंतरच्या राजकीय घडामोडींवेळी पवार केंद्रस्थानी राहिले.
राज्यात नवी राजकीय समीकरणे बनून सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस हे पक्ष एकत्र आले. त्यांना एकत्र आणण्याचे श्रेय पवार यांना दिले जात आहे. त्यांना याआधी मोदी सरकारने पद्मविभूषण सन्मानाने गौरवले.