टीव्हीवरील रामायण, महाभारत, श्री कृष्णा, महादेव या पौराणिक मालिका तसेच विष्णुपुराण ही प्रसार भारतीवरील पौराणिक मालिका केवळ मनोरंजन नसून “आदर्श जीवन’ कसे जगावे, याच्या मार्गदर्शिका आहेत.
प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते, असे म्हटले जाते. पण एक दर्शक म्हणून जी आवड आहे त्यातून वैयक्तिक स्तरावर, सामाजिक स्तरावर काय लाभ होत आहे याचे अवलोकन होणे अत्यावश्यक आहे. लाभ म्हणजे आर्थिक स्तरावरच असतो, असे नाही. वैचारिक स्तरावर लाभ या सूत्राकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. “जुने तेच सोने’ असे कायम म्हटले जाते. पौराणिक मालिकांच्या माध्यमांतून 130 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशवासीयांना ते पटले असेल.
पौराणिक मालिका केवळ मनोरंजन म्हणून न पाहता. त्यातील विचारांतून बोध घेत आपल्यामध्ये कुठे परिवर्तन करता येईल, हे पाहिले पाहिजे. अन्यथा “नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे’ असे होणार. मालिका पाहिल्या जाणार मात्र विचारांची घागर रिकामीच राहाणार. तसे होणे टाळण्यासाठी स्वतःपासूनच बदल करण्यास आरंभ केला पाहिजे. ज्यामुळे इतरही म्हणतील तुमच्यामध्ये आधी अमुक दोष होता. मात्र आता त्याची तीव्रता पुष्कळ अल्प झाली आहे. प्रभू श्रीरामाने 14 वर्षे वनवास सहन केला, हे ऐकून आहोत. त्यामध्ये अनेक अडचणींनाही तोंड द्यावे लागले. आपल्याला अडचणींना तोंड देण्याची वेळ आल्यावर आपली विचारप्रक्रिया कशी असते? आणि अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने ती कशी असली पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे. माझ्याच नशिबात अडचणी का? असे वारंवार म्हणून दु:खी राहून काहीच साध्य होणार नाही. त्यावर मात करण्यासाठी काय करणार याला महत्त्व आहे.
अल्पवयात मुले मोबाइल हाताळण्यास शिकली आहेत. त्या मुलांच्या मोबाइलमध्ये डोकावून पाहिले असता बहुतांशपणे ती कार्टून पाहात असतात, असे दृष्टिक्षेपास पडते. तासन्तास ती त्यात मग्न असतात. हातातील मोबाइल थोडावेळही खाली ठेवण्याचे भान त्यांना नसते. घरातील वृद्ध व्यक्ती पौराणिक मालिका पाहात असतात. शिक्षण-नोकरी-व्यवसाय करणारा युवा वर्ग ऑनलाइन स्ट्रीमिंग साइट्स पाहण्यात व्यस्त असतो, लहान मुले कार्टून पाहून समाधान मानत असतात. एकाच कुटुंबामध्ये वयोमानाप्रमाणे काय पाहायचे याचे विभाजन झालेले पाहण्यास मिळते. यावरून लक्षात येते की, त्यामुळे मतप्रवाह ही भिन्नच असणार आहेत.
आपण जे वाचतो, ऐकतो, पाहतो त्याप्रमाणे कार्यरत राहात असतो. पौराणिक मालिका पाहणारा मोठा वर्ग देशात आहे. हे अचूकपणे हेरत त्यांच्यासाठी टीव्हीवर या मालिका सुरू केल्या आहेत. नेहमी ऑनलाइन स्ट्रीमिंगवर लक्ष केंद्रित केलेल्या वर्गाने पौराणिक मालिका म्हणजे नेमके काय आहे? हे जिज्ञासा म्हणून जाणून घेण्याकडे लक्ष दिले, तर त्यातून एक नवीन माहिती मिळेल. एखाद्या गोष्टीचा अभ्यास असण्याचा दृष्टीने त्याचा उपयोग होईल. एखादा चित्रपट अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला असेल, तर त्या चित्रपटात काय आहे? हे जाणून घेण्यासाठी अनेकांची पावले सिनेमागृहाकडे वळतात. तेव्हा तो चित्रपट पाहिल्यावर त्याच्या अल्पावधीतच प्रसिद्धीचे शिखर गाठण्याचे कारण लक्षात येते. त्या चित्रपटात अमुक गोष्टी आहेत, असे तोंडी सांगून किती सांगणार? आणि ते किती समजणार? ज्या व्यक्तीची जिज्ञासा कायम जागृत असते. त्याला विविध विषयांची माहिती असते. ज्ञान कधीच वाया जात नसते, असे असल्याने पौराणिक मालिका अभ्यासाच्या दृष्टीने पाहिल्या तर पुष्कळ बारकावे लक्षात येतील. राजा कसा असतो. प्रजा म्हणून तिची कर्तव्य काय असतात? इत्यादी. विदेशांतील अभ्यासक भारतातील पौराणिक मुद्द्यांवर अभ्यास करत असतात. त्यासाठी येथे येऊन काही काळ वास्तव्य करून तो भाग विज्ञानाच्या दृष्टीने जाणून घेत असतात.
चांगल्या विचारांची कास पकडणे अनिवार्य आहे. समाजातील वातावरण स्त्री अत्याचार, चोरी, खून आदींविषयी संवेदनशील आहे. असे असताना चांगले विचार वाईट विचारांवर मात करण्यास उपयुक्त ठरत असतात. “वाल्या कोळी’चा “वाल्मिकी ऋषी’ झाले हा इतिहास आहे. अशा प्रकारे इतिहासाची पुनरावृत्ती होणे शक्य आहे. त्यासाठी सुधारण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणे हितावह असते. एक चांगला व्यक्ती बनण्याचे ध्येय तर निश्चित करताच येईल. त्यासाठी मार्ग दाखवणारेही मिळतील. ज्या दिशेने प्रयत्न करत असतो त्यादिशेने मार्गही मिळत असतो. “जुने आचारविचार’ आजही कायम उपयुक्त आहेत. यासाठी ऐकण्याची वृत्ती अंगी बाणवणे हितावह आहे.
– जयेश राणे