विशाखापट्टणम – आंध्रप्रदेशातील वायूगळतीला कारणीभूत ठरलेल्या एलजी पॉलिमर्स कंपनीचा कारखाना बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी तीव्र निदर्शने करताना कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर दोन मृतदेह ठेवले. त्या घडामोडीमुळे कारखान्याच्या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
आंध्रच्या विशाखापट्टणम जिल्ह्यात असणाऱ्या एलजी पॉलिमर्सच्या रसायन कारखान्यात गुरूवारी वायूगळती झाली. त्या दुर्घटनेत 12 जण मृत्युमुखी पडले. सुमारे 300 जणांवर नजीकच्या रूग्णालयांत उपचार चालू आहेत. वायूगळतीनंतर कारखान्याच्या परिसरात असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना विशाखापट्टणममधील निवारागृहांत हलवण्यात आले. ते ग्रामस्थ शनिवारी सकाळी गावात परतले. त्यानंतर कारखाना बंद करण्याच्या मागणीसाठी त्यांनी निदर्शने केली. त्यावेळी आंध्रचे पोलीस प्रमुख डी.गौतम सवांग कारखान्याच्या पाहणीसाठी आले होते. त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थांना कारखान्याजवळ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ग्रामस्थांनी सुरक्षा कडे तोडत कारखान्याचे प्रवेशद्वार गाठले. तिथे त्यांनी धरणे धरले. काही ग्रामस्थांनी इतर दरवाजांतून थेट कारखान्याच्या आवारात धाव घेतली. पोलीस प्रमुखांची भेट घेऊन त्यांनी कारखाना तातडीने बंद करण्याची मागणी केली. कारखान्यामुळे आमचे जीवन उद्धवस्त झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांना संतप्त ग्रामस्थांना पांगवण्यात यश आल्याने तणाव निवळला.