11 ऑक्टोबर हा जयप्रकाश नारायण यांचा जन्मदिवस. म. गांधी व विनोबा यांचे ते शिष्य होते. मात्र त्यांची स्वतःची विचारप्रक्रिया सतत सुरू होती व त्यामुळे त्यांची वैचारिक भूमिका हळूहळू उत्क्रांत होत गेली. तरुण वयात ते प्रखर राष्ट्रवादी होते. रशियाला जाऊन आल्यावर ते मार्क्सवादी बनले. त्यानंतर गांधीजींच्या विचारांनी त्यांना प्रभावित केले. मग राजकारणापेक्षा ते समाजकारणाकडे झुकले. विनोबांची “सर्वोदय’ ही संकल्पना त्यांना भावली. 1972-73च्या काळात देशातला वाढता भ्रष्टाचार, बेकारी, महागाई आणि ढासळती राजकीय परिस्थिती यांच्या विरोधात गुजरातमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन स्वयंस्फूर्त होते. सुरुवातीला त्यांच्या शिक्षणासंबंधीच्या काही तात्पुरत्या मागण्या होत्या. परंतु लवकरच त्या मागण्यांना सार्वकालिक, देशव्यापी स्वरूप आले. राजकीय भ्रष्टाचाराचा अंत करावा, महागाई कमी करावी, बेकारी हटवावी, शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करावा अशा तऱ्हेच्या त्या मागण्या बनल्या. जेपींच्या नैतिक प्रेरणेतून हे आंदोलन उभे राहिले असल्यामुळे त्यांनीच या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारावे अशी चळवळीतील युवकांनी त्यांना विनंती केली.
या आंदोलनातील मागण्या म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचेच रूप असल्याने त्याला “नवनिर्माण आंदोलन’ असे सार्थ नाव पडले. बिहारमधली परिस्थिती गुजरातपेक्षाही वाईट होती; त्यामुळे या आंदोलनाचे लोण बिहारमधे पसरायला वेळ लागला नाही. सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी दडपशाही आरंभली. सरकारची जुलूम जबरदस्ती जसजशी वाढत गेली, तसतसे या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. या आंदोलनाची लाट देशभर पसरली.
हे आंदोलन केवळ राजकीय बदलासाठी नसून संपूर्ण सामाजिक परिवर्तनासाठी आहे, असे चळवळीचे नेते वारंवार सांगत असूनही आपले सरकार उलथवण्यासाठीचा हा कट आहे असाच सरकारने समज करून घेतला व 26 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर झाली. त्यानंतर देशभर धरपकड सुरू झाली. जनतेला घटनेने दिलेले मूलभूत अधिकार गोठवून टाकण्यात आले. कडक सेन्सॉरशिप लादण्यात आली. जयप्रकाशांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. या काळातच त्यांची मूत्रपिंडे खराब झाली व नंतर त्यांना कायम डायलिसिसवर राहावे लागले. टिळकांनी जसे लोकांना महत्त्व दिले, तोच दृष्टिकोन या बाबतीत जयप्रकाश यांचाही होता. टिळकांप्रमाणेच ठिकठिकाणी जाऊन जयप्रकाश यांनी लोकांना जागृत केले. टिळकांप्रमाणेच जयप्रकाश नारायण हे झुंजार वृत्तीचे होते आणि संघर्ष करण्यात ते अग्रभागी राहत. ह्या वीरवृत्तीमुळेच टिळक लोकमान्य बनले आणि जयप्रकाश लोकनायक!
जेपींनी राजकीय संघर्ष केला तरी ते स्वतः सत्ताकांक्षी नव्हते. विजय तेंडुलकर यांनी राजकीय, सामाजिक अशा बऱ्याच मुलाखती घेतल्या आहेत. तेंडुलकर स्वतः बुद्धिमान होते. राजकीय व सामाजिक प्रवाहांची त्यांना उत्तम जाण होती. आंदोलनामागची जयप्रकाश नारायण यांची नेमकी भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आणीबाणीच्या काळात तेंडुलकर त्यांना भेटले. त्यांच्याबरोबर राहिले. तेंडुलकर जयप्रकाश यांना सतत बिहारमधील आंदोलनाविषयी विचारीत होते. पण ते त्यात रमत नसत. तो एखादा नावडीचा विषय असल्यासारखे ते पुनःपुन्हा सर्वोदयाच्याच आठवणी काढीत. तेंडुलकर जेव्हा अगदीच त्यांच्या खनपटीला बसले, तेव्हा दुःखानं ते इतकंच म्हणाले, “सरकारने लोकांच्या प्रश्नांचे अस्तित्वच मुळी नाकारले. सरकारने हे प्रश्न सोडवावेत. मी लगेच आंदोलन मागे घेईन. सर्वोदयात निघून जाईन. मला कसली महत्त्वाकांक्षा आहे?’ स्वतःसाठी कोणतीही महत्त्वाकांक्षा न ठेवता, फक्त देशहितासाठी नाइलाजाने आंदोलन छेडणारे आज कितीजण भेटतील? केवळ लोकांसाठी, न्यायासाठी ठामपणे उभे राहणारे किती असतील? जेपींविषयी तेंडुलकर म्हणतात, “त्यांचे शरीर युद्धाचे नेतृत्व करीत होते पण मन शांततेसाठी आसुसले होते.’
आपल्या मागण्या, आपले कार्यक्रम हे विध्वंसक नसून रचनात्मकच आहेत; आपल्या देशाचे, लोकांचे भले व्हावे एवढीच त्यामागे तळमळ आहे असे जयप्रकाश वारंवार सागत होते. सार्वजनिक वाटपाची व्यवस्था नीट करणे, प्रशासनात चालणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणे, जमीन सुधारणा विषयक कायद्यांचे तंटेबखेडे सोडवणे, दलितांना न्यायाची वागणूक मिळेल याची खात्री पटवणे, हुंडा वगैरेसारख्या दुष्ट रूढींचा नायनाट करणे याच त्यांच्या मागण्या होत्या. ह्या मागण्या तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या असायला हव्यात. आणि सरकारनेही त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत होते; म्हणून लोकशाहीमधे लोक हेच सत्ताधीश आहेत, सार्वभौम आहेत आणि सर्वश्रेष्ठ आहेत याचा साक्षात्कार जेपींनी भारतीय जनतेला घडवला. या आंदोलनातून भारतीय जनतेची सुप्तशक्ती जेपींनी कामाला लावली. त्यातून पुढे अनेक समाजोपयोगी संस्था तयार झाल्या. त्या वेळी जेपींच्या समोर हाच प्रश्न होता की, सत्ताधाऱ्यांवर कोणाचा अंकुश असेल? हाच प्रश्न आजही आपल्यासमोर आहे आणि त्याचे उत्तर जनसंघर्ष किंवा लोकसमिती हेच आहे. एखाद्याचा विचार महत्त्वाचा असेल तर तो पुढे नेण्याची जबाबदारी नंतर येणाऱ्यांची असते. तेव्हा जेपींचे काम पुढे नेणे हेच आता आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि त्यातच आपले हित आहे.
माधुरी तळवलकर