– नंदिनी आत्मसिद्ध
“भारत जोडो यात्रे’च्या अभूतपूर्व यशामुळे राहुल यांनी पुन्हा अमेठीत निवडणूक लढवल्यास ते विजयी होऊ शकतील, असे काही जणांना वाटते. प्रियंका गांधी या वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवतील, असेही बोलले जात आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे काय करत आहेत, काय बोलत आहेत, ते कुठे जात आहेत याबद्दल भारतीय जनता पक्षाला अनावर उत्सुकता असते! राहुलजी राजकारणात आल्यापासून त्यांना पप्पू, शहजादा म्हणून हिणवणे व घराणेशाहीचे प्रतीक मानणे, हे सुरूच आहे. “मोदी’ या शब्दावरून त्यांनी केलेल्या टीकेचा अर्थ चुकीचा लावून, त्यांनी मोदी समाजाचा आणि ओबीसींचा अवमान केला आहे, अशा प्रकारचा आरोप झाला. काही जणांना न्यायालयात धाडण्यात आले. कनिष्ठ न्यायालयाने झटपट आणि फायद्याचा ठरणारा न्याय दिला. न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा दिली. मग राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व वायुवेगाने रद्द करण्यात आले आणि त्यांना अधिकृत सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास लावण्यात आले. यथावकाशसर्वोच्च न्यायालयाने राहुल यांची शिक्षा स्थगित केली आणि त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करावे लागले.
लोकसभेत अविश्वास ठरावावर बोलताना राहुल यांच्या भाषणात सतत व्यत्यय आणण्यात आला. त्यांच्या भाषणातील काही भागच “संसद टीव्ही’वरून (त्याचेच फीड सर्व चॅनेलवाले वापरत होते) दाखवण्यात आला. बाकीच्या वेळेत कॅमेरा सभागृहात फिरत होता! राहुल यांनी दिलेल्या कथित “फ्लाईंग किस’बाबत लोकसभाध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली; परंतु केंद्रीय मंत्री आणि अमेठीमधून राहुल यांच्यावर विजय मिळवणाऱ्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या आरोपांना अध्यक्षांनी प्रतिसाद दिला नाही. स्मृती यांच्या नाटकबाजीकडे जनताही आता दुर्लक्ष करू लागली आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून, गेल्यावेळी राहुल गांधींचा अमेठीत जरी पराभव झाला असला, तरी केरळमधील वायनाड येथून ते निवडून आले होते.
यावेळी राहुल अमेठी लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवतील, असे उद्गार उत्तर प्रदेशचे नवनियुक्त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी काढले आहेत. राजीव आणि सोनिया गांधी यांच्यानंतर सलग पंधरा वर्षे राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व केले होते; परंतु 2019 मध्ये बदलत्या हवेचा अंदाज घेऊन, राहुल यांनी अमेठी व वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे कॉंग्रेसचीही चांगली ताकद आहे. त्यामुळे वायनाड हा सुरक्षित मतदारसंघ मानला गेला. अमेठीमध्ये स्मृती यांनी राहुल यांचा पन्नास हजार मतांनी दणदणीत पराभव केला. परंतु “भारत जोडो यात्रे’च्या अभूतपूर्व यशामुळे राहुल यांनी पुन्हा अमेठीत निवडणूक लढवल्यास ते विजयी होऊ शकतील, असे काही जणांना वाटते. प्रियंका गांधी या वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवतील, असेही बोलले जात आहे.
आज उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे मजबूत सरकार आहे. तेथे कित्येक वर्षे कॉंग्रेसचा सफाया होत आलेला आहे; परंतु राज्यात सातत्याने अपयश येऊन देखील अमेठी व रायबरेली या जागा कॉंग्रेससाठी सुरक्षित मानल्या जात होत्या. मात्र, 2019 मध्ये उत्तर प्रदेशात जवळजवळ सर्वत्र व अमेठीतही कॉंग्रेसला अपयश आले. आता कदाचित उत्तर प्रदेशमध्ये “इंडिया’ आघाडीत जास्त जागा पदरी पाडून घेण्यासाठी, कॉंग्रेसने राहुल अमेठीमधून उभे राहू शकतात, अशी हूल दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे झपाट्याने कामाला लागले असून, त्यांच्या कारकिर्दीत कर्नाटक व हिमाचल प्रदेशात पक्षाला यश मिळाले आहे. खर्गे यांनी अजय राय या ब्राह्मण नेत्याची गेल्या गुरुवारीच प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राहुल यांच्या संदर्भात “घोषणा’ केली! वास्तविक राहुल यांनी कुठे उभे राहावे याचा निर्णय हे राय घेऊच शकत नाहीत.
परंतु कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण व्हावे, हाही त्यांचा यामागील उद्देश असू शकतो. अर्थात “इंडिया’ आघाडीमध्येच कोणत्या पक्षाला किती व कोणत्या जागा सोडायच्या, याचा निर्णय होईल. परंतु तेव्हाही अमेठीची जागा कॉंग्रेससाठी सोडली जाईल, यात शंका नाही. आता अमेठीमधून राहुल गांधी उभे राहणार, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे भाजपमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. लेह येथे सुट्टीचा आनंद घेणाऱ्या राहुल यांना या घोषणेमुळे धक्का बसला असेल, अशी टिप्पणी भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे. मालवीय यांनी आतापर्यंत राहुल यांच्याबद्दल अनेक वेळा अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने मते व्यक्त केलेली आहेत. तर वायनाडच्या जनतेने राहुल यांना नाकारल्यामुळे, ते आता परत अमेठीमधून उभे राहू इच्छितात, असे मत भाजप नेते कौशल किशोर यांनी व्यक्त केले आहे. खरे तर वायनाडमधून राहुल निवडून आले असताना, त्यांना तेथील जनतेने नाकारले, असे हे कौशलजी कोणत्या आधारावर म्हणतात? शिवाय एखाद्या नेत्याचा एकदा पराभव झाला, म्हणजे त्याच मतदारसंघात त्याचा पुन्हा पुन्हा पराभव होतोच, असे नाही.
परंतु अमेठीमध्ये पराभव झाल्यानंतर राहुल यांनी गेल्या चार वर्षांत आपल्या या अगोदरच्या मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले नाही, हे वास्तव आहे. जर त्यांना तिथून पुन्हा उभे राहायचे असेल, तर त्यांना मतदारसंघाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. तेथील जनतेशी संपर्क वाढवावा लागेल; परंतु वायनाडमधील राहुल यांच्या विजयाचे महत्त्व वेगळे आहे. भाजप हा उत्तर भारत केंद्रित पक्ष आहे, असे मानले जाते. अजूनही दक्षिणेत त्याला पाय रोवता आलेले नाहीत. इंदिरा गांधी यांच्या काळात आंध्र, कर्नाटक यासारख्या राज्यांत कॉंग्रेसने सातत्याने विजय मिळवला होता. केरळमध्येही कॉंग्रेस अनेकदा सत्तेवर राहिलेला आहे. इंदिरा गांधींनी चिकमंगळूर येथून आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवला होता. 1999 साली उत्तर कर्नाटकातील खनिजसमृद्ध अशा बेल्लारी मतदारसंघातून सोनिया गांधी यांनी विजय मिळवला. तेथूनच त्यांनी सर्वप्रथम निवडणूक लढवली आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांचा 56 हजार मतांनी दणदणीत पराभव केला. त्यानंतर सोनिया यांनी अमेठीमधून भाजपचे उमेदवार संजय सिंग यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
हे संजय सिंग एकेकाळचे नेहरू-गांधी घराण्याचे निकटवर्तीय. परंतु त्यांना भाजपने हाताशी धरले! कॉंग्रेस हा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष आहे, हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने देखील राहुल गांधी यांनी दक्षिणेतून विजय मिळवण्यास महत्त्व आहे; परंतु ते कुठूनही उभे राहिले, तरी त्यांचा पराभव करण्यासाठी भाजप सर्वशक्तिनिशी प्रयत्न करणार, यात शंका नाही. राहुल असो वा अन्य कोणीही, त्यांना कोणत्याही मतदारसंघातून उभे राहण्याचा अधिकार आहे. राजकारणात टीकाटिप्पणी करतानाच, कोणालाही चुकीच्या पद्धतीने टार्गेट केले जाऊ नये, अशी अपेक्षा असते. उद्या राहुल गांधी अमेठीमधून उभे राहिल्यास, तेथील निवडणूक चुरशीची होईल, यात शंका नाही!