मन! न दिसणारं पण प्रचंड ताकद असलेलं. सगळ्या कृती आपले अवयव करतात. पण कुणाच्या आज्ञेवरून तर मनाच्या. मनात आलं म्हणून केलं, मनाला वाटलं म्हणून केलं. डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी, घटना मन मानत नाही म्हणून स्वीकारल्या जात नाहीत. मनाला पटत नाही म्हणून मुरड घातली जाते.
मन नक्की कुठे आहे मेंदूत, हृदयात ठाऊक नाही. एकमेकांबरोबर राहणाऱ्या व्यक्तींची मनं जुळली तर आयुष्य नंदनवन होऊन जातं. नाहीतर वर्षानुवर्षे एकत्र राहणाऱ्या व्यक्तींची अवस्था मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा या मनाची झेप किती तर बहिणाबाई म्हणतात-
आता होतं भुईवर
गेलं गेलं आभाळात
आवडत्या व्यक्तीशी भेट होणार असेल तर शरीराच्या आधी मन तिथं जाऊन पोचतं. म्हणून व्यंकटेश स्तोत्रात म्हटलं आहे-
अचपळ मन माझे न आवरे आवरीता खूप वेळा कुटुंबातील व्यक्तींबरोबर राहूनही म्हणतात की, माझं मन कुणाला कळलंच नाही. माझ्या मनासारखं कधी झालंच नाही.
पूर्वीच्या स्त्रिया खूप काही मनात साठवून ठेवायच्या. मात्र मनात साठवून कधीही बाहेर न पडल्यामुळे त्याचा एखाद्या दिवशी विचित्र प्रकारे स्फोट होतो.
मानसशास्त्रज्ञ सांगतात, प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी कुणीतरी हवंच. पण तरीही काहीजण व्यक्त होऊ शकत नाहीत. अशावेळी डायरी लिहावी आणि आपल्या मनातलं त्यात मांडावे, मोकळे व्हावे.
काही प्रसंगात मन अगदी तरल, फुलपाखरू होते. एखाद्या संगीताने धुंद होऊन जाते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे जग प्रेममय होऊन जाते. कुणी एखादा मनातलं बोलून टाकणारा तर कुणीतरी अबोल राहणारा. त्यामुळे त्याच्या मनात खोलवर काय चालले ते कळत नाही. चित्रकार मनातलं कागदावर रेखाटतो, लेखक लेखणीतून दाखवून देतो, कवीच्या शब्दातून त्याच्या भावना उमटतात. मनाविषयी म्हणतात एक वेळ समुद्राचा तळ शोधता येईल पण माणसाच्या मनाचा थांग लागत नाही.
शरीराचे आजार दिसतात, मनाचे आजार नाही. काही आजार चटकन बरेही होत नाहीत. यासाठी वास्तवात जगा, स्वत:चा स्वीकार करा, स्वत:वर प्रेम करा. ज्यातून मनाला स्थैर्य येते. आनंदी मन, उदास मन, अस्वस्थ मन, स्थिर मन, अस्थिर मन अशी किती रूपं. मन अस्वस्थ झालं की काही देवघरात जाऊन बसतात, काही आपल्या आवडीची गोष्ट करतात, आवडीची गाणी ऐकतात. एखाद्याला उगीच रडू येतं. कधीकधी मनात नक्की काय चालले हे आपलं आपल्याला कळत नाही. अमका माझ्या जवळचा म्हणजे मनाने त्याला तिला आपलं मानलेले असतं.
नीलम ताटके