पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आप व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा अतिम निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे. बहुतेक राज्यांमध्ये जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपाला धक्का बसला असून, ही आघाडी तोडण्यासाठी भाजपा षड्यंत्र रचत असल्याच आरोप आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत केला.
ही आघाडी तोडण्यासाठी आपच्या वरिष्ठ नेत्यांना अनेक लोकांकडून संदेश मिळत आहेत की, आम आदमी पक्षाने इंडिया फ्रंट आघाडी सोडली नाही, तर सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करतील, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे किर्दत यांनी या वेळी सांगितले.
शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, सतीश यादव , अक्षय शिंदे, अमोल मोरे, निरंजन अडागळे, किरण कद्रे, अमोल काळे, तसेच इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. किर्दत म्हणाले, की तथाकथित दिल्ली दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी आणि सीबीआयला कामाला लावले आहे.
गेल्या दोन वर्षांत १००० हून अधिक छापे टाकण्यात आले आहेत. इडीने ७ समन्स पाठवले आहेत. सीबीआयने अनेक नोटिसा पाठवल्या आहेत. केजरीवाल यांची सीबीआयकडून ९ तास चौकशी करण्यात आली आहे; पण सीबीआय आणि ईडी दोघांनाही एक पैसा किंवा इतर ठोस पुरावा असे काही सापडले नाही. मात्र, आप इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या भीतीने भाजपाची चलबिचल झाली असून, केजरीवाल यांना अटक होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.