सातगाव पठार भागातील शेतकरी संकटात
पेठ- गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सातगाव पठार भागातील शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे. वाटाणा, फरशी, धना आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
बटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात. वेफर्स, पापड बनविण्यासाठी आवश्यक बटाटा सातगाव पठारावर घेतला जातो. त्या बटाट्यांची चव वेगळीच आहे. येथील बटाटा देशात प्रसिद्ध आहे. येथील वातावरण बटाटा पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने या सातही गावांत खरीप हंगामात सुमारे साडेदहा हजार एकरावर बटाटा पीक घेतले जाते.
महिनाभरापूर्वी लागवडीसाठी आणलेल्या बटाटा बियाणे संततधार पावसामुळे शेतात लावता न आल्यामुळे सडले होते. बटाटा पिकासाठी शेतकऱ्यांने टाकलेली खते पावसामुळे वाहून गेली आहेत. सततचा पाऊस, ढगाळ हवामान, पीक वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाशाचा अभाव अशा बिकट परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. संततधार पावसामुळे शेतजमीन उपळली असून लावलेल्या बटाटा सरीमधून नितळ पाणी वाहताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
- महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे तरकारी पीक हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे दोन ते अडीच कोटीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
मनोहर कंधारे, शेतकरी पेठ