खोट्या स्टोऱ्या व भावनेच्या आधारावर अर्थव्यवस्थेशी खेळ केला जात आहे.
पणजी: देशात सध्या सर्वच क्षेत्रात निर्माण झालेले मंदीचे वातावरण हे मनुष्य निर्मीत आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षाने पुन्हा एकदा केला आहे. खोट्या स्टोऱ्या, भावना भडकावणे आणि भलत्यासलत्या खुलाशाच्या आधारावर अर्थ व्यवस्था चालवली जात आहे. वास्तविक देशाची अर्थव्यवस्था ही वस्तुस्थिती आणि लॉजिकच्या आधारे चालवली पाहिजे, पण भाजपच्या राज्यात सध्या भलतेच घडताना दिसत आहे अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली आहे.
चुकीची आर्थिक धोरणे, घिसाडघाईत राबवलेला जीएसटी, जाहींर केलेल्या धोरणांतील धरसोड अशा सगळ्या घटनांमुळे देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे असे ते म्हणाले.गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अर्थकारणावरील व्याख्यानात त्यांनी हा दावा केला.
ते म्हणाले की सध्या सगळ्याच आर्थिक क्षेत्रात नकारात्मक वातावरण असताना विकासात वाढ कशी होणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. अनौपचारीक क्षेत्रातील विकासदराचा विचार केला तर देशाचा आर्थिक विकास दर सध्या शुन्यापेक्षाही खाली असल्याचे स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. भारताला मोठ्या लोकसंख्येचे वरदान लाभले आहे पण मोदी सरकारने या वरदानाचे विनाशात रूपांतर केले आहे. महाराष्ट्रातील पीएमसी बॅंकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणात सर्व संचालकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.