नवी दिल्ली : राज्यघटनेतील 370 वे कलम हा जम्मू-काश्मीरच्या विकासाचा अडथळा होता. आता दिल्ली-कट्रा “वंदे भारत’ एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्यापासून या प्रदेशातील प्रगतीचा प्रवास सुरू झाला, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
“वंदे भारत’एक्सप्रेसच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि हर्ष वर्धन यांच्यासह शहा यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून गाडीला हिरवा झेंडा दाखवला. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करणे आणि “वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करणे ही सरकारची दोन पावले नव्या जम्मू-काश्मीरमध्ये नवभारत आणेल आणि या भागासाठी नवा इतिहास घडवेल, असे मंत्र्यांनी सांगितले.
“कलम 370 हा केवळ या देशाच्या ऐक्यासाठी एक अडथळा नव्हता, तर काश्मीरच्या विकासासाठीचा हा सर्वात मोठा अडथळा होता. मला खात्री आहे की 370 कलम काढून टाकल्यानंतर आम्ही दहशतवाद आणि त्या क्षेत्रातील दहशतवादाच्या कल्पनांचा पूर्णपणे नायनाट करण्यात यशस्वी होऊ.’ असे शहा म्हणाले.
येत्या दहा वर्षांत जम्मू-काश्मीर हा देशाचा एक सर्वाधिक विकसित प्रदेश होईल. विकासाला चालना देण्यासाठी आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठीच “वंदे भारत’ अस्तित्वात आणली गेली आहे. या एक्स्प्रेसने विकासाचा प्रवास सुरू झाला आहे, असे ते म्हणाले.
2 ऑक्टोबर रोजी झालेल्या महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधीजींचे स्मरण करून शहा म्हणाले की, गांधींनी जगातील सर्वात मोठ्या समस्यांचे साधे निराकरण कसे करावे याबद्दल एक तत्वज्ञान दिले. “वंदे भारत’ एक्स्प्रेस संपूर्णपणे स्वदेशी असल्याचे आणि जगातील अद्ययावत रेल्वे तंत्रज्ञानाच्या बरोबरीचे असल्याबद्दल शहा यांनी अभिमान व्यक्त केला.