कोपरगाव -कोपरगाव औद्योगिक वसाहतमधील वारंवार खंडित होणारा विद्युतपुरवठा सुरळीत व्हावा. वारंवार कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक बिपिन कोल्हे यांनी महावितरणकडे सतत पाठपुरावा करुन देखील त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे वसाहतीमधील कारखानदारांनी महावितरण कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केले. तसेच जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत कारखानदार वीजबिल भरणार नाहीत, असा इशारा दिला.
लॉकडाऊन कालावधीत कोपरगाव औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखाने बंद असल्याने कारखानदारांचे मोठे नुकसान झाले. त्यातच कान्हेगाव, वारी, संवत्सर, कोकमठाण या गावांसह इतर काही भागातील गावे कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या उपकेंद्राची 33 के. व्ही. लाइनला जोडलेली असल्याने वसाहतीमधील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे उद्योजकांचे मोठे नुकसान झाले.
त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील विद्युतपुरवठा सुरळीत होण्यासाठी स्वतंत्र फिडर बसविल्यास कारखानदारांना अखंडीत विद्युत पुरवठा होण्यास मदत होईल. त्याचबरोबर कारखानदारांना नेहमीच होणारा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. स्वतंत्र फिडर बसविण्यासाठी वसाहतीमधील कारखानदारांनी वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या अंदोलन केले.
वसाहतमधील विद्युतपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करणार असल्याचे लेखी आश्वासन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवान खराटे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी वसाहतीचे उपाध्यक्ष मनीष ठोळे, पराग संधान, केशवराव भवर, रोहित वाघ, नीलेश वाके, अभिजित रहातेकर, नरेंद्र कुर्लेकर, भरत शिंगी, जनार्दन वाके, कान्हाभाई रावलिया, देविप्रसाद मिश्रा, रवींद्र शिंदे, चाचा चौधरी, मंगेश सरोदे, ज्ञानेश्वर नाईकवाडे, साईप्रसाद कदम, पप्पू वाडेकर व कारखानदार उपस्थित होते.