राजगुरूनगर- जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा आता हटवण्यात आला असून त्याचे द्विभाजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे आता दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जाणार आहेत. हे विधेयक बहुमताने मंजूर झाल्याबद्दल राजगुरूनगर येथे बजरंग दल आणि आरएसएसतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निर्णयाच्या समर्थनार्थ सोमवारी (दि.5) सायंकाळी 7 वाजता पंचायत समिती चौक महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोर सर्व देशभक्त नागरिक, बजरंग दल पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. काही कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर उपस्थितांनी लाडू वाटप करत, फटाक्यांची आतिषबाजी करत आंनद साजरा करून आम्ही सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयासोबत ठामपणे उभे आहोत अशीच ग्वाही दिली. बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कलम 370 व 35 अ बाबत माहितीपर विचार प्रकट केले. यावेळी बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.