मंचर- मागील अनेक दिवसांपासून विविध मागण्या सरकार दरबारी मांडुनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे, परंतु याचा फटका ग्रामीण भागात आता चांगलाच जाणवू लागला आहे. सरकारने ग्रामसेवकांच्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी केली आहे.
ग्रामसेवक संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. सरकारने ग्रामसेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामसेवक संघटनांनी 22 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात आंबेगाव तालुक्यातील सर्व 80 ग्रामसेवकांनी 103 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. तसेच कार्यालयाच्या चाव्या आणि शिक्के गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या. याप्रसंगी आंबेगाव तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष अनिल टेमकर, सचिव हनुमंत तारडे, जनार्दन नाईकडे, शितल वाळुंज, रुपेश मोरे, नामदेव डोके, मनिषा वळसे, सुवर्णा गोसावी, सचिन नवले, हनुमंत बारवे, के. डी. भोजणे, सचिन उंडे इत्यादी ग्रामसेवक उपस्थित होते, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे मार्गदर्शक जनार्दन नाईकडे यांनी दिली.