उत्पान्नात घट होण्याची भीती : महाळुंगे इंगळे परिसरातील स्थिती
महाळुंगे इंगळे- महाळुंगे इंगळे व परिसरातील खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, रासे, भोसे, वाकी, येलवाडी, शेलपिंपळगाव, सांगुर्डी, कान्हेवाडी, खालुंब्रे, सावरदरी आदि भागात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. या भागातील नदी, नाले, जलाशये व सिंचन प्रकल्प तुडुंब भरून नद्यांनीही अक्षरशः धोक्याची पातळी ओलांडली आहे. कमी जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने ऊन सावलीचा खेळ सुरू असून, पिके पिवळी पडून धोक्यात आली आहेत.
या वर्षातील जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने शेतकऱ्यांनी रिमझिम पावसाच्या ओलीवर पेरण्या केल्या होत्या; परंतु जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावून वार्षिक सरासरीपेक्षा उच्चांक गाठला. मागील दहा बारा दिवसांमध्ये अधुन मधून पावसाची हजेरी सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून, खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत. दिवस दिवस सूर्यदर्शन होत नसल्याने व अधिकच्या पावसामुळे भुईमूग, सोयाबीन, उडीद, चवळी, मूग, वाल आदी कडधान्य व भाजीपाला पिके पिवळी पडून वाया जावू लागली आहेत. पाऊस कमी असला तरी ढगाळ वातावरण असेच राहिल्यास पिकांच्या उत्पन्नात निम्म्याने घट, तर काही भागात पूर्णपणे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कृषी विभागाच्या वतीने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून महसूल विभागाने पंचनामे करावेत, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
- निसर्गाच्या बदलामुळे शेतकरी अडचणीत
निसर्गातील आमुलाग्र बदलांमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. मोठ्या प्रमाणावर भुईमूग लागवड करण्यात येत होती. मात्र, कमी जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सध्याचा सुरू असलेला पाऊस त्यासाठी योग्य आहे. तरीही अनेक ठिकाणी भात पिके पाण्याखाली असल्याने पिवळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतर पिकांना या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.