- बीआरटीएस मार्गावर बस धावायला अजून तीन महिने आवकाश
चऱ्होली – आळंदी ते पंढरपूर पालखीमार्गाला राज्य महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या दिघीपर्यंतच्या पालखीमार्गाचे काम महापालिकेने चार टप्प्यांत करीत रुंदीकरण केले आहे. साठ मीटरचा विस्तीर्ण रस्ता करून या मार्गावर पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, सेवा रस्ता, बीआरटीएस मार्ग, वृक्षारोपण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकांमध्ये सोय करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याच्या मधोमध केलेला बीआरटीएस मार्गावर एकही बस अद्याप धावली नाही. या बीआरटीएस मार्गावर प्रस्तावित असलेले बसथांबे, लोखंडी दुभाजक, भुयारी मार्ग अशा अनेक कामांना कोविडच्या प्रादुर्भावाचा फटका बसला असून, या मार्गावर बस धावायला अजून तीन महिने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चऱ्होलीपासून ते दिघीतील दत्तनगरपर्यंत हा बीआरटीएस मार्ग करण्यात आला आहे. मात्र अद्याप पीएमपीएलच्या बसेस ह्या मुख्य मार्गाने ये-जा करीत आहेत. बीआरटीएस मार्गावरील प्रलंबित बस थांब्यांचे कोविडच्या प्रादुर्भावात काम बंद झाले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या परिपत्रकामुळे शहरातील अनेक विकासकामे ठप्प झाली होती. यामध्ये दिघी-आळंदी पालखीमार्गावर होत असलेल्या अनेक विकासकामांचा प्रामुख्याने समावेश होता. आता या विकासकामांना कासवगतीने सुरुवात झाली असली तरी निविदेच्या रकमेमध्ये कुठलीही वाढ होणार नसून, फक्त मजूर वाढीमध्ये बदल होऊ शकतो, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सायकल ट्रॅक गायब
पालखीमार्गावर सायकल प्रवाशांसाठी असलेला सायकल मार्ग गायब झाल्याचे चित्र आहे. पालखीमार्गावर नेमका सायकल मार्ग कोणता हा नागरिकांना मुख्यतः प्रश्न पडला आहे. तसा सूचनाफलक पालखीमार्गावर लावलेला दिसत नाही. जेथे रस्ता मोकळा आहे त्या साई मंदिरासमोरील रस्त्यावर भाजी मंडई करिता व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. दुसऱ्या बूाला तर हा मार्ग वाहन पार्क करण्यासाठी व व्यवसायाकरिता वापर होत आहे. सायकल प्रवाशांना मुख्य रस्त्याची वाट धरून प्रवास करावा लागत आहे.
दिघी-आळंदी पालखीमार्गावरील बसथांब्यांचे काम सुरू झाले आहे. कोविडमुळे काम बंद होते. मात्र खर्चात वाढ झालेली नाही. मजुरी वाढ होऊ शकते. राज्य शासन व केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार कोविडमध्ये थांबलेल्या विकासकामांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे परिपत्रक आहे. साधारण तीन महिन्यांत बस थांब्यांची कामे पूर्ण होऊन मार्गांवर बीआरटीएस बस धावेल असे नियोजन आहे.
– विजय भोजने, प्रवक्ता बीआरटीएस विभाग