नगर -न्या. एम. जी. गायकवाड मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे मराठा समाज राज्य घटना कलम 340 मधील आरक्षणास पात्र ठरला आहे. सबब, मराठा समाजाचा सरसकट ओबीसी संवर्गात समावेश करावा अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा शाखेतर्फे आज करण्यात आली.
या संदर्भात जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिता काळे व उत्तर जिल्हाध्यक्ष संपूर्णा सावंत यांनी निवेदन देऊन यावर चर्चा केली. प्रदेश सचिव राजश्री शितोळे, शहराध्यक्षा सुरेखा कडूस, नगरसेविका संध्या पवार, ऍड. अनुराधा येवले, सविता मोरे, मिनाक्षी वागस्कर, मंदा वडगणे, मीनाक्षी जाधव, माधुरी साळुंके, मंगल शिरसाठ, श्रद्धा पवार, ज्योती काळे, प्रतिभा काळे आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
राज्य शासनाने न्या. एम. जी. गायकवाड आयोगाच्या सर्व शिफारसिंचा स्वीकारून विनाविलंब राज्यात मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षण यादीत करून मराठा समाजावर वर्षानुवर्ष होणारा अन्याय दूर करावा.
जोवर मराठा समाजास सर्व निकषांवर टिकणारे आरक्षण मिळत नाही तोवर राज्य सरकारने पोलीस भरती प्रक्रियेस स्थगिती द्यावी, अशी मागणीही मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आली.
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला ओबीसी दर्जा नाकारला होता. आता न्या. एम. जी. गायकवाड आयोगाने सरळ व स्पष्टपणे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र असल्याचा अहवाल सादर केला असतानाही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू केले जात नाही. त्यामुळे मराठा समाजावर मोठा अन्याय होत असल्याची भूमिका महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.