नगर – करोना संकट काळात थांबलेला केटरिंग व्यावसाय सरकारच्या जाचक अटीमुळे मर्यादीत झाला आहे. केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले खरे पण तेही या व्यावसायासाठी कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारच्या यादीत या व्यावसायाचा कुठेच नामोल्लेख नाही. त्यामुळे व्यावसायिकांना कर्ज देण्यास बॅकांनीही हात आखडता घेतला आहे.
त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने केटरिंग व्यावसायिकांसाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी अहमदनगर केटरिंग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यानी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकड केली आहे.
वर्षभरातील ठराविक मुर्हूतावरच केटरिंगचा बिझनेस चालतो. मार्च ते ऑगस्ट असा बिझनेसचा कालावधी असतो. यंदा मात्र, मार्चपासूनच टाळेबंदी सुरू झाली. मात्र, यामध्ये विवाह सोहळ्यांना जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. पन्नास माणसांच्या मर्यादेत होणारा सोहळा पाहता केटरिंग व्यावसाय अनेकांना नकोसा झाला आहे.
केंद्र सरकारच्या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी एमएसएमइ (उद्योगआधार) नोंदणी केली. त्यानंतर धंद्यासाठी कर्ज मिळावे याकरीता बॅंकांकडे प्रपोजल टाकले. पण बॅंकांनी केटरिंग व्यावसायासाठी कर्ज देण्यासंदर्भात कोणतेच सर्क्युलर आले नाही.भांडवलाअभावी अनेकांनी हा धंदाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
नुसतेच हेलपाटे
ज्या बॅंकेत खाते आहे, त्या बॅंकेत केटरिंग व्यावसायिकांनी कर्ज मागणी करणारे अर्ज भरून दिले आहेत. बॅंक मॅनेजरची भेट घेऊन कर्ज मिळाव,े अशी विनवणी केली, पण सरकारकडून असे कर्ज देण्याबाबत कोणतेच निर्देश प्राप्त झालेले नाहीत, असे सांगत बॅंकेवाले रिकाम्या हाताने माघारी पाठवित आहेत. आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर केटरिंग व्यावसायिक बॅंकेत नुसतेच हेलपाटे मारत आहेत. या व्यावसायिकांना आज कोणीच वाली नसल्याची खंत राजेंद्र उदागे यांनी व्यक्त केली.