विधानसभेच्या निवडणूका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी
मुुंबई – लोकसभा निवडणूकीत “लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवणारे आणि लोकसभा निकालानंतर राजकीय पडद्यावरून गायब झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आज केंद्रिय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. “मॅच फिक्स असेल, तर नेट प्रॅक्टिस करून उपयोग काय?’ असे सुचक विधान करीत महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका ईव्हीएमद्वारे न घेता जुन्या पद्धतीने म्हणजेच मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
मात्र, ही भेट केवळ औपचारिक असून इतक्या महत्वाच्या विषयावर आयोग फारसा गंभीर नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मला शून्य अपेक्षा आहे, असे सांगतानाच मुंबईत परतल्यानंतर आपली पुढील भूमिका जाहिर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर एक महिना शांत राहिलेले राज ठाकरे यांनी आज दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएमबाबत लोकांना शंका आहेत. जे उमेदवार हरले आहेत त्यांना शंका आहेच. पण जे जिंकले आहेत, त्यांनाही शंका आहे की मी निवडून कसा आलो. यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणूका या ईव्हीएमद्वारे न घेता जुन्या पद्धतीने म्हणजेच मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी करणारे निवेदन राज ठाकरे यांनी मुख्य आयुक्तांना दिले. एका माध्यमसंस्थेच्या अहवालानुसार नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये 373 मतदारसंघांत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात तफावत आढळली आहे.
त्यापैकी 220 मतदारसंघांत तर प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते मोजलेली आहेत. संपूर्ण देशात ही तफावत सुमारे 58 लाख मतांची आहे. निवडणूक आयोगाने याची साधी चौकशी तर केली नाहीच पण आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावरून ही माहितीच गायब केली. निवडणूक आयोगाला पुरवठा झालेल्या व प्रत्यक्ष त्यांच्या ताब्यात असलेल्या ईव्हीएमच्या आकडयांत चक्क 20 लाखांची तफावत आहे.
तसेच ईव्हीएममध्ये वापरण्यात येणारी चीप ही अमेरिकेतून आयात करण्यात आली आहे. ज्या मशिनमध्ये असा परकीय हात आहे, त्या मशिनवर जनतेने कसा विश्वास ठेवायचा. तसेच यंत्राबाबत शंका दूर करण्यासाठी जे पाउल आयोगाने उचलले तेव्हा हॅकर्सना फक्त तीन ते चार तास देण्यात आले. त्यांना मशिनला हात देखील लावू दिला नाही.ईव्हीएमबद्दल या व अशा अनेक तांत्रिक बाबी आहेत की ज्यांच्या भोवतीचे रहस्य गडद आहे. त्यामुळे आयोगाने पुन्हा एकदा कागदी मतदानपत्रिकेकडे जावे व महाराष्ट्रात होउ घातलेल्या विधानसभा निवडणूका या फक्त आणि फक्त कागदी मतपत्रिकांवरच घ्याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी निवेदनाद्वारे आयोगाकडे केली.
मला दिल्ली ओळखता आली नाही
राज ठाकरे हे तब्बल चौदा वर्षांनंतर राजधानी दिल्लीत गेले. याआधी 2005 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाचे आमंत्रण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना देण्यासाठी ते दिल्लीत गेले होते. आता दिल्लीत काय फरक जाणवला असे विचारले असता, मला दिल्ली ओळखताच आली नाही. यापूर्वी आलो होतो तेव्हा विमानतळावर उतरल्यानंतर “धौला कुआं’ अशी पाटी दिसायची. आता ती पाटी गायब होउन मोठा बोर्ड दिसत होता, असे राज ठाकरे म्हणाले.