कोल्हापूर: मे महिना म्हंटल की लग्न सराईची धामधूम. या धामधुमीत अनेक लग्न चर्चेत आलेली आपण पहिली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात सुद्धा असंच एक लग्न चांगलंच चर्चेत आलं आहे. कारणही अगदी तसंच आहे. नवरी मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नाचं व्हराड चक्क ३० हुन अधिक बैलगाड्यांमधून नेले.
लग्नसराईत आपले लग्न खूप चांगले नियोजन पूर्ण, विनाविघ्न पार पडावे आणि आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहावे अशी प्रत्येक मुलीच्या वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मग प्रत्येकजण लग्नात वेगवेगळ्या युक्त्या लढवत असताना पाहायला मिळतं. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावात सुद्धा असंच एक लग्न चांगलंच चर्चेत आलं आहे.
जुन्या आणि पारंपरिक पद्धतीनं नवरी मुलगीच्या वडिलांनी व्हराड चक्क बैलगाड्यांमधून नेले आहे. कोलोली गावातील मारुती श्रीपती जाधव यांची एकुलती एक मुलगी तृप्ती जाधव हिचं लग्न आयुष्यभर लक्षात राहावं म्हणून त्यांना काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. मुलच लग्न कोलोलीतीलच विजय पांडुरंग पाटील या मुलाशी होणार होते त्यामुळे मुलीकडच्या व्हराडाला कसं घेऊन जायचं हा त्यांच्या मनात विचार होताच आणि मुळात शेतकरी असल्यानं व्हराड बैलगाडीतूनच घेऊन जायचं त्यांनी ठरवलं.
वडिलांनी गावातील ३० हुन अधिक बैलगाडींचं बुकिंग करून त्या बैलगाड्या आकर्षक सजवून आणि मूलगीला घोड्यावर बसवुन अगदी दिमाखात लग्नाचं व्हराड नेले. विशेष म्हणजे नेहमी शेतातल्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना बैलपोळा सोडला तर त्यांना कधी कोणी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. पण लग्नाचं व्हराड न्यायचं म्हटल्यावर बैलगाड्यांच्या मालकांनीही खुश होऊन गुलाबी फेटे बांधले होते. नवरी मुलगीच्या वडिलांच्या या निर्णयाचे गावकऱ्यांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं आणि मुलीचं लग्न नेहमी लक्षात राहावं ही असणारी ईच्छा सुद्धा या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.