नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि राज्यांनी आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील योजना अधिक कार्यक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे.
आयोगाच्या अभ्यास अहवालानुसार जर भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात केला तर त्यामुळे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न वाढूू शकते. त्याचबरोबर2030पर्यंत या तंत्रज्ञानामुळे जागतिक उत्पन्नही 15.7 लाख कोटी डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
जर भारताने या तंत्रज्ञानाचा वापर केला तर 2035 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत 957 अब्ज डॉलरची वाढ होऊ शकेल.
त्याचबरोबर भारताच्या विकासदरात यामुळे 1.3 टक्क्यांची वाढ होऊ शकेल, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. त्यांनी अशा प्रकारचे पत्र केंद्रीय मंत्रालये आणि राज्य सरकारला पाठविले आहे. या मंत्रालयांनी विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू करावा. त्याचबरोबर आगामी काळात वापर वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
यासंदर्भात मदतीची काही गरज असल्यास आम्ही मदत करण्यास तयार आहोत. अर्थमंत्रालयाने नीती आयोगाला यासंदर्भात एक आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार नीती आयोग या तंत्रज्ञानाचा वापर कसा वाढविला जाईल यावर विचार करीत आहे. तसेच या तंत्रज्ञानामुळे आर्थिक-सामाजिक परिस्थितीत काय फरक पडू शकेल तसेच सर्वसमावेशक विकासासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकेल का यावर विचार करीत आहे.