पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाने चांगला जोर धरला आहे. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या पाण्याची पातळी शहरवासियांसाठी दिलासादायक ठरली आहे. धरणातील पाणीसाठा 13 टक्क्यांवरुन 17 टक्क्यांवर पोहचल्याने संभाव्य पाणीकपात केली जाणार नसल्याचे संकेत महापालिका प्रशासनाकडून मिळाले आहेत.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. यंदा पहिल्यांदाच धरणात पाणीसाठा सर्वांत कमी म्हणजेच 13 टक्क्यांवर आला होता. पावसाला विलंब होत असल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीकपात आणखी तीव्र करुन, दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे संकेत दिले होते. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या कालावधीत धरणातील पाणीसाठ्यात 4 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आणखी पाणीकपातीचे शहरवासियांवरील संकट तूर्तात तरी टळले आहे. 1 जूनपासून 434 मिमी पाऊस पडला आहे. तर, गेल्या 24 तासात 90 मिमी पाऊस झाला असून 2.33 टक्के पाणीसाठा वाढला आहे. धरणात सद्यस्थितीत 17. 43 टक्के पाणीसाठा झाला आहे.