अशी मागणी केल्याने ऐन दुष्काळात पाणी प्रश्न पेटणार
फलटण – निरा-देवधर धरणातील शिल्लक पाणीसाठ्याचा प्रश्न अचानक राजकीय वळणावर गेला आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन सादर केले. यासंदर्भात थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजनांना फोन केल्यामुळे या प्रश्नाचे राजकीय गांभीर्य वाढले.
ते माळशिरस तालुक्यातील उन्हाळी हंगाम 2018-2019 मधील हक्काचे 1.92 टीएमसी वाटपाचे पाणी शिल्लक पाणीसाठा पूर्ण क्षमतेने सोडण्याची मागणी करण्यासाठी नीरा उजवा कालवा फलटण येथील कार्यालयात रणजितसिंह नाईक निंबाळकर, अर्जुनसिंह मोहीते पाटील, किशोर सुळ उपसभापती माळशीरस ता. प. स, रुषिराज नाईक निंबाळकर, तुकाराम शिंदे,नानासो इवरे, यांचेसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या निवेदनात दि. 17 मे रोजी फाटा बंद करणार असल्याने पहिल्या आवर्तन अपूर्ण असतानाही पाणी बंद न करता सलग दुसरे आवर्तन सुरू ठेवावे आवर्तन बंद केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी केली.
दि.3 एप्रिल 2017 रोजी नीरा डाव्या कालव्यातून 60 टक्के बारामती/ इंदापूर भागात पाणी वापरण्याची मुदत संपुष्टात आली असतानाही मागील 2 वर्षे पाणी वापरास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नसतानाही विनापरवाना नियमबाह्यपणे डावपेच करून आमच्या हक्काचे पाणी डावा कालवामधून 60 टक्के बारामती/इंदापूरकडे पळविले आहे. विनापरवाना मागील दोन वर्षे कोणत्या आधारे अथवा कोणाच्या परवानगीने नीरा डावा कालव्यातून पाणी सोडत आहात आमचे आवर्तन शिल्लक असताना पाणी बंद करता आणि दुसरीकडे मुदत संपूनही पाणी कसे काय सुरू आहे असा सवाल कार्यकारी अभियंता निलेश निकम यांना केला यावर कोणत्याही प्रकारचे माहिती अथवा लेखी परवानगी दाखवण्यास निलेश निकम असमर्थ ठरले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना थेट फोन करून सविस्तर माहिती दिल्यानंतर लवकरच यावर तातडीने निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर वादावर पडदा पडला.
बारामतीकरांनी पाणीवापर स्थितीचा पध्दतशीर गैरफायदा घेवुन पळवाट काढुन जलसंपदा विभागास हाताशी धरून वीर धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या नीरा देवघर धरणासाठीच्या कालव्याची कामे अपुर्ण असल्याचे सांगून त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणीवापर सद्यस्थितीत होऊ शकत नाही, ही बाब विचारात घेवून सदर धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यापैकी 60 टक्के पाणी नीरा डावा कालव्यासाठी बारामतीकर यांनी सुरू केले. ज्याचा पाण्याशी संबध नाही ते आमच्या हक्काचे पाणी वापरत आहेत आणि ज्यांचा पाण्यावर हक्क आहे त्यांचे आवर्तन बंद कसे करता. धरणामध्ये पाणी उपलब्ध असुनही त्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येत नाही. खंडाळा, फलटण, माळशीरस तालुक्यांना वरदायी ठरणाऱ्या निरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या हक्काचे पाणी यापुढे कोणालाही देणार नाही असा इशारा निंबाळकर यांनी दिला.