ना. विजय शिवतारे: ठिबक सिंचन योजनेची अंमलबजावणी करा
सातारा – शेतकऱ्यांनी ऊस लागवडीच्या मागे न लागता फळबाग लागवडीवर भर देणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले. तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांनी ठिबकची मागणी केली आहे. त्यांना तात्काळ ठिबकसंच उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्हा परिषदेच्या छ. शिवाजी महाराज सभागृत आयोजित खरीप हंगाम- 2019 आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, जिल्हा उपनिंबधक प्रकाश आष्टेकर आदी उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम 2019 ची पूर्वतयारीची माहिती दिली. तसेच 500 हेक्टरवर काजू लागवडीचे नियोजनही करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर आ. जयकुमार गोरे व आ. शशिकांत शिंदे यांनी खरीप हंगामात कृषी अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करता कामा नये तसेच शेतकऱ्यांना मागणी होताच बियाण्याचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासह सर्व तालुका कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.