नवी दिल्ली -भाजपचे अध्यक्ष अमित शहा, द्रमुक नेत्या कनिमोळी यांच्याबरोबरच रविशंकर प्रसाद आणि स्मृती इराणी या केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांनी संबंधित पाऊल उचलले.
प्रसाद बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांची जागा भाजपकडून मित्रपक्ष लोजपसाठी सोडली जाण्याची शक्यता आहे. लोजपचे प्रमुख रामविलास पासवान यांना केंद्रात पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ते लोकसभा आणि राज्यसभा यापैकी संसदेच्या कुठल्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे प्रसाद यांच्या जागी राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागू शकते. तर शहा आणि स्मृती यांच्या राजीनाम्यामुळे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांवर केंद्रीय मंत्री बनलेले मात्र संसदेच्या कुठल्याच सभागृहाचे सदस्य नसलेल्यांना संधी दिली जाऊ शकते.
शहा यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून विजय मिळवला. तर स्मृती यांनी उत्तरप्रदेशच्या अमेठीत थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवला.