अहमदनगर: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या मित्रपक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना गुरूवारी महाराष्ट्रात उधाण आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील भेट त्या चर्चांसाठी कारणीभूत ठरली. दरम्यान, यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने घवघवीत यश मिळवल्यामुळे विरोधकांची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्षही त्याला अपवाद ठरले नाहीत. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पवार आणि राहुल यांची भेट झाल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांत विलीन होण्याची शक्यता असल्याच्या राजकीय अटकळी बांधल्या जाऊ लागल्या. त्या अटकळींसाठी विरोधी पक्षनेतेपद हेही एक कारण बनले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण या अफवा आहेत. आमची अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ही चर्चा फक्त मीडियामध्ये आहे,’ असं म्हणत त्यांनी विलीनीकरणाबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.