पुणे – कधीकाळी माहिती पोहोचविण्यासाठी आणि ख्याली खुशाली विचारण्यासाठी नागरिक पोस्टाचा आधार घेत होते. मात्र, सध्या मोबाइल आणि सोशल मीडियामुळे हा विभाग दुर्लक्षित झाला आहे. तरीही या विभागाची “क्रेझ’ अद्याप संपलेली नाही. या विभागाबद्दल नागरिकांमध्ये अद्यापही आदर आहे. त्याशिवाय गुंतवणुकीसाठी या विभागाचा विश्वासाने वापर केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आगामी काळात “गाव तेथे पोस्ट कार्यालय’ ही संकल्पना अंमलात आणण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी मोबाइल अथवा संपर्क साधण्याचे अन्य साधन नसल्याने नागरिकांकडून पोस्ट खात्याचा आधार घेतला जात होता. त्यातूनच अनेकांना त्यांच्या नातेवाईकांची ख्याली खुशालीची माहिती मिळत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत संपर्काची अनेक साधने आली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून या विभागाचा संपर्क साधण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. हे वास्तव असतानाच ग्रामीण भागात गुंतवणुकीसाठी पोस्ट खाते हेच विश्वासार्ह मानले जात आहे.
विशेष म्हणजे अनेक पतसंस्था आणि बॅंकाही डबघाईला आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना विशेषत: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या गुंतवणुकीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. परिणामी, हक्काचे आणि विश्वासाचे खाते समजल्या जाणाऱ्या पोस्ट खात्यामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. हे वास्तव, असतानाच काही गावांमध्ये पोस्टाचे कार्यालय नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी अथवा रक्कम काढण्यासाठी जवळच्या गावामध्ये जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावांमध्ये पोस्ट कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. त्यांची ही मागणी लक्षात घेऊन सर्व गावांमध्ये पोस्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय पोस्ट मास्तर आर. एस. गायकवाड यांनी दिली.