वर्ष उलटले तरी अद्याप कामाला सुरुवात नाही : प्रशासनाला पडला विसर
पुणे – नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालये उभारण्याला मंजुरी देऊन वर्ष झाले तरीही अद्याप कामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मंजुरी केवळ कागदावरच राहिली असून प्रशासनाला या कामाचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात अनेक तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ आहेत. त्यांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची व पर्यटकांची संख्याही मोठी आहे; परंतु त्याठिकाणी सुलभ शौचालयांची सुविधा नसल्यामुळे लघुशंकेसाठी नागरिकांना आड्योशाला जावे लागते. त्यामध्ये महिलांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील “अ’ दर्जाची तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, मुख्य बाजारपेठा आणि पालखी मार्ग याठिकाणी कायमस्वरूपी सार्वजनिक सुलभ शौचालय संकुल उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 76 शौचालये संकुल उभारण्याचा मानस असून पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील दोन गावे निवडण्यात येणार आहेत. त्यासाठी 9.5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे होते.
नेमके कुठे घोडे अडले
मात्र यात नेमके घोडे कुठे अडले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच आजही पर्यटनस्थळ, बाजारपेठा याठिकाणी शौचालयांची व्यवस्था नाही. तर ज्याठिकाणी जुनी शौचालये आहेत. त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तोपर्यंत जुनी शौचालयांची दुरूस्ती आणि साफसफाई तरी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात
आहे.