-पावसाळ्याच्या तोंडावर कामाची गती रोडावली
-रस्त्यांचा प्रश्नही ऐरणीवर
पिंपरी – पावसाळ्यात कोणतीही समस्या यायला नको, ठरवून दिलेल्या मुदतीत नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. परंतु हे आदेश कागदावरच राहिले आहेत. नियोजित “स्मार्ट सिटी’ म्हणून बोलबाला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर अद्याप पावसाळ्यासाठी तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे तसेच खोदलेले रस्ते पूर्ववत होणे गरजेचे असतानाही शहरातील अनेक भागातील नाल्यांची सफाई अपूर्ण आहे. रस्ते पूर्ववत करणे तर दूर परंतु अजूनही उपनगरांमध्ये रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे चित्र आहे. शहरात पावसाचे आगमन झाले आणि पालिका प्रशासनाच्या दाव्यांची पोल-खोल झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांचे चोख नियोजन करण्यात येत. मात्र हे नियोजन कागदावरच राहते हे पुन्हा एका सिद्ध झाले आहे. मे महिन्यात आढावा बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये नालेसफाईचे काम करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र, 15 मे तारीख उलटल्यानंतरही अनेक भागात नालेसफाईच्या कामाला सुरवातही झाली नव्हती. नुकतीच पावसाने हजेरीही लावली मात्र अनेक ठिकाणच्या नालेसफाईला सुरुवातही झाली नसल्याचे समोर आले आहे. कासारवाडी, यमुनानगर, तसेच निगडी, चिंचवड परिसरातील अनेक भागामध्ये नालेसफाईची कामे अपुर्ण आहेत. याबाबत तात्काळ उपायोजना न केल्यास पावसाळ्यात नाले तुंबण्याच्या भितीमुळे अनेक अडचणीला समोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात लहान-मोठे स्वरुपात जवळपास 200 हून अधिक नाले आहेत. यातील अनेक नाल्याची सफाई होणे बाकी असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाचा पदभार असलेले डॉ. अनिल रॉय नालेसफाईचे काम पूर्ण करण्यात कमी पडल्याची बाब समोर आली आहे. अद्याप जोरदार पावसास सुरुवात झालेली नसल्याने अपूर्ण कामे तात्काळ मार्गी लागावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
धोकादायक झाडांचाही प्रश्न कायम
पावसाळ्यापुर्वी करण्यात येणारा कामांमध्ये नालेसफाई, गटारीची कामे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपाययोजना करणारी यंत्रणा, नियंत्रण कक्ष, पाणी निचरा करणारी यंत्रणा, धोकादायक झाडांची नोंद घेवून त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची कामे केली जातात. मात्र नालेसफाईबरोबरच धोकादायक झाडांचा प्रश्न अद्यापही कायम आहे. पहिल्या पावसापुर्वी आलेल्या वाऱ्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने धोकादायक झाडांचा प्रश्नही गंभीर बनला आहे.