‘ घनकचरा व्यवस्थापन विभागाची आजपासून धडक कारवाई कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक
पुणे – महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता आपला मोर्चा मंगलकार्यालयांकडे वळवला असून, तेथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात “ड्राईव्ह’ हाती घेतला जाणार आहे. “स्वच्छ भारत मिशन’ हा विषय महापालिकेने अतिशय गांभीर्याने घेतला असून, आता वर्षभर आधीपासूनच त्याची तयारी सुरू केली आहे. याचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना देऊन, त्यांच्याकडून अधिकाधिक केसेस दाखल करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, शौच करणे, मूत्रविसर्जन करणे यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय प्लॅस्टिकचा वापर याचाही समावेश करण्यात आला आहे. “स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत महापालिकेने केवळ याच गोष्टी नव्हे तर सार्वजनिक कार्यक्रमांशी संबंधित असलेल्या आस्थापनांमध्येही जनजागृती आणि दंडात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यातीलच एक भाग म्हणून सोमवारपासून मंगलकार्यालयांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे.
दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना तेथेच कचरा जिरवण्यासंदर्भात जागृती केली जात आहे. अशा सोसायट्यांनी नियमांचे पालन न केल्यास किंवा सोसायटीत अंतर्गत छोटा कचरा प्रक्रिया प्रकल्प न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मग अशा मंगलकार्यालयांमधून रोज किंवा सिझनला निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात त्यांना समज देणे किंवा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे महापालिकेतील संबंधित विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच ही कारवाई करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने आता विविध आस्थापनांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा करणे यासह अन्य प्रकारांत महापालिकेने गेल्या सहा महिन्यांत 19 हजार जणांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी महापालिकेने चौकांमध्ये, सिग्नलला उभे राहून “गार्बेज बॅग’ विकणाऱ्यांवर कारवाई करून, त्या जप्त केल्या. तसेच भाजीविक्रेते आणि फळ विक्रेत्यांकडील प्लॅस्टिकवरही कारवाई केली. हा ड्राईव्ह कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.