वडोदरा -सत्तारूढ भाजपच्या धोरणांनी देशातील जनतेला छळले. त्यामुळे जनता लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला सत्तेबाहेर घालवेल. त्यातून 23 मे या निकालाच्या दिवशी नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान बनतील, असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी मंगळवारी केला.
भाजपकडून गुलाबी चित्र रंगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यावेळी जनता स्वत:ची दिशाभूल होऊ देणार नाही. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्षांची महाआघाडी पंतप्रधान निवडेल, असा विश्वास पटेल यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी प्रचारात राष्ट्रवाद आणि दहशतवाद हे मुद्दे लावून धरत असल्याबद्दल भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपने त्या दोन मुद्द्यांवर कॉंग्रेसला सल्ला देण्याची गरज नाही. दहशतवादाशी लढताना कॉंग्रेस नेत्यांनी प्रसंगी प्राणांचेही बलिदान दिले आहे, असे ते म्हणाले. यावेळी गुजरातमधील लोकसभेच्या 26 पैकी 12 ते 15 जागा कॉंग्रेस जिंकेल, असा दावाही त्यांनी केला. मागील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला त्या राज्यात खातेही उघडता आले नव्हते.