कोल्हापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ आहेत, असा उपरोधिक टोला शरद पवार यांनी कोल्हापूर येथे आज लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
यावेळी पवार यांनी गांधी आणि पवार कुटुंबावर मोदी यांनी वर्धा येथील पहिल्याच सभेत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा कोणा एकट्या-दुकट्याची नाही. राज्यातील आणि देशातील लक्षावधी कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. हे सारेजण पक्षाची काळजी वाहण्यास तत्पर असल्याने मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसची काळजी करू नये. गांधी घराण्याने देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या मोदींकडून जास्त अपेक्षा करू नयेत, असा सल्ला पवार यांनी दिला आहे.