अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवर लक्ष दिले तर महानगरात गुंतवणूक करण्याबाबत बहुतांश मंडळी उत्सुक दिसून येत आहेत. ऍनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटने केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार टायर-2 आणि तीन शहरात राहणारे 40 टक्के नागरिक हे 7 मोठ्या शहरात मालमत्तेत गुंतवणूक करण्यात प्राधान्य देत आहेत.
मालमत्तेतील गुंतवणूक ही सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी मानली जाते. त्यामुळे आजकाल बहुतांश नागरिकांचे एकापेक्षा अधिक फ्लॅट दिसून येतात. हे चित्र केवळ महानगरातील नाही तर जिल्हास्तरीय पातळीवरही दिसून येत आहे. एवढेच नाही तर राहत्या शहरापेक्षा अन्य शहरातही गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यानुसार ऍनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटने केलेल्या सर्व्हेक्षणात सामील असलेले सर्वाधिक 28 टक्के नागरिक बंगळूरमध्ये तर 25 टक्के नागरिक दिल्लीत गुंतवणूक करू इच्छित आहेत. 17 टक्के लोकांनी पुण्याला पसंती दिली तर 12 टक्के नागरिक मुंबईच्या बाजूने आहेत. एकीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये घर खरेदी करण्याची इच्छा बाळगून असणारे 25 टक्के नागरिक आणि दुसरीकडे दिल्लीत राहणारे नागरिक उपनगरात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. या मंडळींची संख्या 12 टक्के आहे आणि ते शंभर ते 200 किलोमीटर अंतरावर देखील गुंतवणूक करण्यास तयार आहेत. मालमत्ता गुंतवणूक करताना 38 टक्के नागरिक हे ऑफिस आणि शाळेचे स्थान लक्षात घेत आहेत. 62 टक्के नागरिक जवळच्या उपनगरात गुंतवणूक करू इच्छित आहेत. अर्थात 12 टक्के नागरिक टायर-2 आणि तीन शहरात गुंतवणूक करु इच्छित आहेत. त्यात सोनीपत, जयपूर आणि चंडीगड या शहरांचा समावेश आहे. या शहरांच्या परिसरात विकासकामे झपाट्याने होत आहेत.
सर्व्हेक्षणात इन्व्हेस्टमेंट ऍसेट क्लासचा देखील आढावा घेतला गेला आहे. त्यात म्हटले की, दिल्ली-एनसीआरमधील 55 टक्के नागरिक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. तर 25 टक्के नागरिक सोन्यात, 16 टक्के नागरिकांनी मुदत ठेवी आणि 4 टक्के नागरिकांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा प्रकट केली आहे. टायर-2 आणि टायर-3 शहरातील 67 टक्के नागरिक मालमत्तेत गुंतवणूक करू इच्छित आहेत. त्याचवेळी 15 टक्के नागरिक सोन्यात, 16 टक्के मुदत ठेवीत आणि दोन टक्के नागरिक शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करु इच्छित आहेत. मालमत्ता खरेदीसाठी बायर्स सेंटिमेंटची देखील चाचपणी करण्यात आली. दिल्ली एनसीआरमध्ये 51 टक्के नागरिक रेरामुळे निर्माण झालेल्या विश्वासाच्या वातावरणात घर खरेदी करू इच्छित आहेत तर 32 टक्के नागरिक घरांच्या किमंतीत घसरण झाल्याने तर 15 टक्के नागरिक कमी व्याजदर आणि 2 टक्के नागरिक अन्य कारणांमुळे घर खरेदी करण्यास उत्सुक आहेत. त्याचवेळी टायर-2 आणि टायर-3 शहरातील नागरिक रेरापासून फारसे प्रभावित झाले नाहीत. या आधारावर केवळ 4 टक्के नागरिक घर खरेदी करू इच्छित आहेत. 31 टक्के नागरिकांनी कमी किंमत आणि 27 टक्के नागरिकांनी घटलेल्या व्याजदरामुळे घर खरेदी करण्याची इच्छा बोलून दाखविली.