प्रवेश कोटा पूर्ववत करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये होणाऱ्या प्रवेशांमध्ये विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. यासंदर्भात प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ते धोरणात्मक बदल केले जातील, अशी ग्वाही पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून गुरुवारी देण्यात आली. मात्र, यंदाच्या वर्षापासून सुरू केलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 70 टक्के कोटा रद्द करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांद्वारे होत आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये होणाऱ्या प्रवेशांमध्ये मागील वर्षापर्यंत परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के, तर इतर विद्यार्थ्यांसाठी 30 टक्के इतक्या जागा राखीव होत्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाने 70:30 हे सूत्र बदलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 70 टक्के प्रवेशाचा कोटा पूर्वीप्रमाणेच सुरू करावा. प्रवेशाचा कोटा रद्द करू नये; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज दिला आहे. त्यावरून विद्यापीठ प्रवेशाचा कोट्यावरील वाद चर्चेत आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवली जात असताना गुरुवारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा झाली. त्यात विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांचे किमान 70 टक्के प्रवेश होतील. जेणेकरून त्यांचे शैक्षणिक हित जोपासले जाईल, असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यापीठाने स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसल्याचे नमूद केले. मात्र, प्रवेशाचा कोटा रद्द केला नसल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट केले नाही.
प्रवेशाच्या कोट्यावरून मतभिन्नता
स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी 70 टक्के कोटा हा असलाच पाहिजे, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर स्थानिक कोट्यातील सर्व प्रवेश होत नाहीत. काही विभागाचे प्रवेश दिवसेंदिवस रिक्त राहात आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कोटा पद्धत बंद करण्याचा घेतलेला योग्य असून त्यामुळे राज्यातील विविध भागातील गुणवंत व देशातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
प्रवेशाचे 70:30 हे सूत्र म्हणजे काय?
यंदा प्रथम विद्यापीठाच्या विविध विभागातील प्रवेश ऑनलाइनद्वारे होत असून त्यासाठी प्रवेश परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यात स्थानिक विद्यार्थ्यांसह देशातील सर्व विद्यार्थ्यांनाचे प्रवेश परीक्षेच्या गुणांवरून होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत देशातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा. त्यासाठी 70:30 ही पद्धतबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 70 टक्के कोटा पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी, तर 30 टक्के कोट्यात देशातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जात असे.
कोटा पद्धतीचा फारसा परिणाम होणार नाही!
यापूर्वी 90:10 असे प्रवेशाचा कोटा होता. त्यानंतर कालांतराने 70:30 ही पद्धत सुरू झाली. सध्या प्रवेशाच्या कोट्यावरून दोन वेगळे मतप्रवाह सुरू असले तरी, त्याची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. पुणे विद्यापीठाचे अभ्यासक्रम अद्ययावत असून त्यात अन्य राज्यांतील विद्यार्थी गुणवत्तेत सरस ठरतील, अशी शक्यता कमी आहे. एवढेच नव्हे, आपलीच मुले प्रवेशप्रक्रियेत अधिक सहभागी होतील. त्यामुळे प्रवेशाचा कोटा रद्द केला तरी त्याचा फारसा परिणाम स्थानिक विद्यार्थ्यांवर होणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञाने स्पष्ट केले आहे.