पुणे – गेल्या दहा वर्षांत राज्याला भारनियमनमुक्त करुन आणि दर्जेदार सुविधा देत महावितरणने ग्राहकांना दिलासा दिला आहे. मात्र, या सुविधा पुरवित असतानाच प्रशासनाने साडेचार वर्षांत तब्बल सहावेळा वीज दरवाढ लादली आहे.
दरवर्षाला ही दरवाढ कमी असली तरीही या कालावधीत 30 ते 94 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय या काळात विजेचा स्थिर आकारही 105 ते 146 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.
घरगुती ग्राहकांना महिन्याच्या स्थिर आकारात 40 रुपये, घरगुती थ्री-फेज मीटरला 130 रुपये आणि वाणिज्यिक मीटरसाठी 190 रुपये लागत होते. त्यामध्येही वाढ करण्यात आली आहे. याबद्दल महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले, “या दरात वाढ करण्यात आली असली तरीही ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले आहेत. उपकेंद्राची उभारणी, तसेच जुन्या उपकेंद्रासह ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविणे यासाठी निधी खर्च करण्यात आला आहे. त्याशिवाय वीजटंचाईच्या काळातही सुरळीत आणि अखंडित वीजपुरवठा करण्यात आला आहे.’