पुणे – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होउ नये, यासाठी एसटी महामंडळाने त्यांच्या बसेसवर लावलेल्या सरकारी जाहिराती काढून टाकल्या आहेत. यासंदर्भात काही राजकीय पक्षांनी आयोगाकडे तक्रारी केल्यानंतर आयोगाने त्याबाबत महामंडळाला सूचना दिल्या होत्या, त्यानुसार या जाहिराती काढून टाकण्याची प्रक्रिया महामंडळाच्या वतीने पूर्ण करण्यात आली असून आयोगाला तसे लेखी पत्र देण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचाव्यात या हेतूने शासनाच्या वतीने राज्यभरातील एसटी महामंडळाच्या 11 हजार बसेसवर जाहिराती लावल्या होत्या. वास्तविक कोणत्याही निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार या जाहिराती तात्काळ काढून टाकणे सर्व संस्थांना आणि राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु होउनही एसटी महामंडळाने त्यांच्या बसेसवर लावलेल्या सरकारी जाहिराती काढून टाकल्या नव्हत्या, यासंदर्भात काही राजकीय पक्षांनी तक्रारी केल्यानंतर आयोगाने महामंडळाला त्यासंदर्भात सक्त ताकीद दिली होती. त्याशिवाय आयोगाने महामंडळाकडून तशी लेखी हमीही घेतली होती, त्यानुसार महामंडळाने त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली असून तसे लेखी पत्रही महामंडळाला देण्यात आले आहे अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.