डासांची पैदास वाढली : संतप्त नागरिकांचा आंदोलन करण्याचा इशारा
नागरिकांच्या जीवाशी खेळ
आंबेगाव बुद्रूक येथील धबाडी वस्तीत गेले पंधरा दिवस सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे रोगराई उद्भवण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी स्वच्छता कळविले, पण याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले असून सांडपाणी व्यवस्थापन विभाग आमच्या आरोग्याशी खेळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आंबेगाव -आंबेगाव बुद्रूक येथील धबाडी वस्तीवर गेले पंधरा दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या सांडपाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. या प्रकाराबाबत नागरिकांनी सांडपाणी व्यवस्थापन विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या, पण संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आंबेगाव पठार येथील सर्व्हे क्रमांक 15 व 16 येथील मैलापाणी उघड्या गटारीतून धबाडी वस्ती येथे सोडले जाते. याठिकाणी बंद ड्रेनेज व्यवस्था नसल्याने उघड्यावरच हे सांडपाणी वाहत जाते. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी जमिनीत मुरते आणि परिसरात पसरले. अनेक ठिकाणी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही ठिकाणी बांधकामे झाली आहेत. त्यामुळे हे मैलापाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये सुद्धा शिरते. ृहा भाग गेल्या दीड वर्षांपासून पालिकेत समाविष्ट झाला आहे तरी अजूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या भागात एक जिवंत झरा होता. त्याचे पाणी काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात येथील नागरिक वापरत होते. पण आता गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी त्यामध्ये मिसळल्याने हे पाणीसुद्धा पिण्यायोग्य राहिलेले नाही. परिणामी, लोकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर उघड्या गटारीचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे बोअरेवलला सुद्धा पाणी दुर्गधीयुक्त येत आहे. त्यामुळे हे पाणी नागरिकांना वापरता येत नाही. या परिसरात म्हसोबाचे मंदिर आहे. या मंदिरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त पाणी शिरल्याने देवाची पूजा करण्यासाठीसुद्धा मंदिरात जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या परिसरातील समस्यांबाबत पालिकेला कळवूनही कोणतीही ठोस उपायोजना केली जात नाही. याबाबत महानगर पालिकेने लक्ष घालून लवकरात लवकर ड्रेनेजच्या पाण्याची निचऱ्याची व्यवस्था करावी व लोकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू.
अतुल दांगट पाटील, ग्रामपंचायत सदस्य