स्वच्छ हवामान पाहून पावसाबाबतची चिंता वाढली
केडगाव – जून महिना सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील पाऊस न झाल्याने शेतकरी बांधवाची चिंता आता वाढू लागली आहे. हक्काचे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले, मृगाने काहीअंशी दिलासा दिला; परंतु मागील पाच-सहा दिवसांपासून आकाशातील स्वच्छ हवामान पाहता मागील दुष्काळी दिवस पुन्हा येणार तर नाही ना, अशी भीती आता केडगाव परिसरातील नागरिकांना सतावू लागली आहे.
हवामान खात्याने चालू वर्षी सरासरी 95 टक्के पाऊस होणार, जून महिन्यात दमदार सुरुवात होणार, असा अंदाज व्यक्त केला होता. हवामान खात्याच्या अंदाजावर भरोसा ठेवून काही शेतकरी बांधवांनी शेतीची मशागत सुरुवात केली. बियाणे आणि खते खरेदी केली. खिशात असणारा पैसा खर्च केला; परंतु सध्याच्या वातावरणाची स्थिती पाहता हवामान खात्याचा अंदाज पूर्णपणे फेल गेला असून रोहिणी तर कोरडे गेलेच आणि मृगाने काहीअंशी दिलासा देऊन सध्या दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागल्या आहेत. पाऊस झालाच नाही, तर आर्थिक गणित कोलमडून पडण्याची भीती त्याला सतावू लागली आहे. खिशात पैसा उरला नाही तर प्रपंच कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. मुलांच्या शाळांची फी आणि इतर खर्च भागवण्यासाठी नेमके काय करायचे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. सध्या वातावरणात उकाडा जाणवत आहे.
आकाशात ढगही आहेत परंतु पाऊस पडत नाही. ऊन-सावलीच्या खेळात दिवस सरत आहेत, त्यामुळे सामान्य नागरीक धास्तावला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सध्या त्याची वणवण सुरू आहे. दोन वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने अशी भयानक स्थिती निर्माण झाली आहे. चालू वर्षी पाऊस झालाच नाही किंवा आणखी लांबला तर शेतकऱ्यांची स्थिती गंभीर होणार आहे.