वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा सोमवारी मोर्चा
नगर – नगर शहरात गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा येत्या 24 तासांच्या आत सुरळीत करावा, अन्यथा सोमवारी (दि.17) आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने दिला.
याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, प्रा. अरविंद शिंदे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्रा.सिताराम काकडे, शिवा कराळे, ऍड. गजेंद्र दांगट, विशाल शिंदे, सागर गुंजाळ, शशिकांत गायकवाड, नाझीर शेख, लाला खान, अमित अवसरकर, संतोष ढाकणे आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी दुपारी भेट घेवून निवेदन देत चर्चा केली.
या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी (दि.10) नगर शहरामध्ये झालेल्या पावसानंतर शहरातील बऱ्याच भागामध्ये वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे शहरामध्ये जवळपास सर्वच भागामध्ये वीज नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे व त्यातच वीजपुरवठा बंद असल्याने घरातील फॅन, कुलर चालत नसल्यामुळे नागरिकांचा जीव उष्णतेने कासावीस होत आहे. संपूर्ण रात्र शहरातील नागरिकांना जागे राहून काढावी लागत आहे. शहरावर निर्जळीचेही संकट आलेले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शहरातील बऱ्याच भागामध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. याचाच अर्थ महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना अतोनात हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे गुरुवारी पोलीस वसाहतीमध्ये तरुणीला जीव गमवावा लागला. याबाबत कारवाई केली जावी. येत्या 24 तासामध्ये शहरातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.