-माधव विद्वांस
शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे स्पेशालिस्ट, शिल्पकलेचे मराठी सम्राट विनायक पांडुरंग करमरकर यांचे आज पुण्यस्मरण (निधन 13 जून 1967)त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1891 रोजी रायगड जिल्ह्यात सासवणे येथे झाला. ते वडिलांबरोबर घरात गणपतीच्या मूर्ती बनवित. ते सुंदर चित्रेही काढीत असत.
वर्ष 1910 मधे जिल्ह्याचे कलेक्टर, ओटो रोथंफिल्ड सासवणे येथे आले होते. तेथील रामाचे देवळामध्ये करमरकरांनी काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र पाहिले त्यांना ते खूप आवडले. त्यांनी करमरकरांना बोलवून घेतले. ही त्यांच्या जीवनाला वळण देणारी घटना ठरली. त्यांच्यातील कलाकार त्यांनी ओळखला व मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिष्यवृत्ती मिळवून दिली. 1913 मध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून ते पहिले आले व त्यांनी लॉर्ड मेओ पदक प्राप्त केले. डॉ. भाजेकर व ओटो रोथंफिल्ड यांनी त्यांची गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व त्यांचे पुतणे सुरेंद्रनाथ टागोर यांच्याशी ओळख करून दिली.
गुरुवर्यांनी त्यांची कला पाहून कलकत्ता येथे व्यवसाय करण्याची सूचना दिली व तेथे राहण्यासाठी व स्टुडिओसाठी जागा दिली. कलकत्ता येथे आल्यावर बेलूरमठातील रामकृष्ण परमहंसांचा संगमरवरी पुतळा करण्याचे पहिले व्यावसायिक काम मिळाले. तेथे काही आणखी मराठी मित्र मिळाले व त्यांनी महाराष्ट्र निवास उभारले. दरम्यान, अनेक शिल्पकृती त्यांनी बनविल्या.
याच वेळी टाटा कंपनीमार्फत ते दोन वर्षांसाठी लंडन येथे रॉयल अकॅडमीत आणखी शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. तेथील अभ्यासक्रम पूर्ण करीत असतानाच त्यांनी युरोपातील फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड येथील शिल्पकृतींचाही अभ्यास केला. कलकत्ता येथील फाइन आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात त्यांनी ठेवलेले शंखध्वनीचे 4 फुटी शिल्प बरेच गाजले.पुण्याचे मिलिटरी संकुलमधील शिवाजी महाराजांचा 13 फूट उंचीचा 8 टन वजनाचा पुतळा करण्याचे काम छ. शाहू महाराजांनी त्यांच्यावर सोपविले व त्यासाठी त्यांची मुंबई येथे राहण्याची व्यवस्थाही केली.
बडोदा येथील महाराज सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे छ. शाहू महाराज, गोंडलचे राजे, ग्वाल्हेरचे राजे अशा संस्थानिकांकडून त्यांना बोलवणे आले. बडोद्यासाठी त्यांनी अनेक पुतळे तसेच महाराजांच्या चेहऱ्याची मुद्रा असलेले नाणेही तयार केले. दरम्यान, 1947 मधे त्यांना अमेरिकेतून मिल्टन विद्यापीठाकडून प्रात्यक्षिकासाठी बोलवणे आले. प्रेक्षकांच्या समोरच तेथील डीन डलांन यांचाही पुतळा करून दाखवला.त्याचवेळी भारत स्वतंत्र झाला.
त्यांनी महात्मा गांधीजींचे अनेक पुतळे घडविले. त्यांनी त्यांच्या सासवणे गावात एक छोटे संग्रहालय उभे केले आहे. या छोटेखानी संग्रहालयात सुमारे 200 शिल्पे ठेवली आहेत. त्यांच्या घरातील नोकरापासून ते गोठ्यातील प्राण्यांची शिल्पेही तेथे बघण्यास मिळतात. भारत सरकारने पदमश्री पुरस्काराने गौरवले व 1963 वर्षीचा बेस्ट आर्टिस्ट ऑफ द ईयर हा पुरस्कारही दिला. या कलामहर्षींना अभिवादन.