वाघोली – वाघोली परिसरात मोबाइलवर बोलताना अचानक कॉल ड्रॉप वाढले असल्यामुळे ग्राहक वैतागले आहेत. त्यामुळे दूरसंचार कंपनीकडून तसेच खासगी मोबाइल कंपन्यांकडून याची दक्षता घेतली जात नसल्यामुळे ग्राहकांचा मनस्ताप होत आहे.
मोबाइलवर बोलताना संभाषण तुटणे (कॉल ड्रॉप), नेटवर्क नसणे, रेंजमध्ये सातत्याने चढउतार होणे, इंटरनेट पूर्ण क्षमतेने काम न करणे, रेंज असूनही कॉल न लागणे आदी तक्रारी ग्राहक करीत आहे. खराब नेटवर्कमुळे कॉल ड्रॉपचे प्रमाण वाढले असल्याने नागरिक दूरसंचार कंपन्यांच्या सेवेला कंटाळले आहेत. “ट्राय’ ने कॉल ड्रॉप करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाघोलीतील नागरिक करीत आहे. मोबाइलवर बोलत असताना मधेच संभाषण तुटून कॉल “ड्रॉप’ होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. अचानक नेटवर्क गेल्याने कॉल ड्रॉप होणे, काही भागांत नेटवर्कच नसणे, डाटा वापरताना नेटवर्कचा वेग कमी होणे; अशा समस्यांना वाघोलीतील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांना पैसे मोजूनही संपर्क साधताना मर्यादा येत आहेत.
वाघोली परिसरातील कंपन्यांचे ग्राहक आणि त्यांना सामावून घेणारे नेटवर्क टॉवर्सची संख्या पुरेशी नाही. त्यात काही टॉवर दुरूस्तीकरिता अधूनमधून बंद ठेवावे लागतात. त्यामुळे नेटवर्कची समस्या अधिकच गंभीर होते. सध्याची परिस्थिती पाहता सगळ्याच कंपन्यांना थोड्या प्रमाणात सेवा पुरवताना अडचणी येत आहेत. नागरिकांच्या तक्रारी पाहता कंपन्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
वाघोली परिसरात अनेक दिवसांपासून कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही एका दूरसंचार कंपनीचे नाही, तर सर्वच कंपन्याच्या बाबतीत गेल्या अनेक दिवसांपासून कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
– गणेश कुटे, भाजप.