राहुरी – शिवसेनेची जनादेश यात्रा ही महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविणेसाठी आहे. लोकसभा निवडणूकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकीतही राज्यातील जनता भगव्या विचाराच्या युतीचेच सरकार आणणार असल्याचा ठाम विश्वास युवा सेनेचे प्रमुख युवा नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
त्यांचे नेतृत्वाखालील राज्यातील संपर्क यात्रा राहुरीत साडेतीन वाजता पोहोचली. त्यावेळी सहा सात मिनिटाच्या छोटेखानी भाषणात आदित्य ठाकरे म्हणाले. सरसकट कर्जमाफी घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी शिवसेना मिळवूनच देईल. पीक विमा प्रश्नी शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला. शेतकरी अन्नदाता आहे. त्यांचे विषयीची आस्था म्हणून महानगरातील शिवसैनिक, शहरी लोक मोर्चात आले होते. आम्ही विमा कंपन्यांनी पंधरा दिवसांचीच मुदत दिली असली तरी मोर्च्याचे परिणाम दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील 17 कोटी पैकी चौदा कोटी रूपये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. उर्वरित रक्कम या सप्ताहात दिली जाईल.
शिवसेनेची व भाजपची युती भगव्या विचारांची युती आहे. ती केवळ सत्तेची, मते मागणारी युती नाही. ही यात्रा हा भगवा विचार गावोगाव, खेडोपाडी नेण्यासाठीच आहे. यात्रेचा हा पाचवा दिवस असून सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकांचे आर्शीवाद मिळावेत म्हणून ही यात्रा आहे. लोकांना हात उंचावण्याचे आवाहन करीत आपण मला युतीला विधानसभा निवडणूकीतही आशीर्वाद देताल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे उत्तर नगरप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी स्वागत केले. नगरसेवक नितीन तनपुरे यांनी पुष्पगुच्छ दिला. या यात्रेचे राहुरीत जोरदार स्वागत झाले. तब्बल तीन तास ढोलताशे वाजवत होते. यात्रेतील मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण होणार होते. ते मात्र राहून गेले.