अलिगड – मी देशातील दहशतवाद संपुष्ठात आणण्याचा प्रयत्न करीत असताना विरोधक मात्र महाभेसळीची आघाडी करून मलाच सत्तेवरून हटवण्याच्या प्रयत्नात आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या आघाडीच्या राजकारणाचा त्यांना त्यांच्या वैयक्तीक राजकीय कारणांसाठी लाभ होईल पण त्यातून देशहित साधले जाणार आहे काय असा सवाल त्यांनी केला. आज उत्तरप्रदेशातील अलिगड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला.
आपल्या सरकारने पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांवर हल्ला केला त्याचे समर्थन करताना मोदी म्हणाले की आम्ही बालाकोट येथे जो एअर स्ट्राईक केला त्यात जराही चुक झाली असती तर विरोधकांनी आपल्यावर कडाडून हल्ला केला असता. पण मोदी कधीच आपल्या वैयक्तीक हिताचा विचार करीत नाही आपण केवळ देशहिताचाच विचार करतो असे त्यांनी यावेळी नमूद केले. देशातून भ्रष्टाचार, दहशतवाद, आणि दारिद्य्र नष्ट व्हावे यासाठीच आपला सारा लढा सुरू आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की देशातील लष्कराला लागणारी सर्व सामग्री या देशातच तयार करण्याची आम्ही योजना असून त्याचा मोठा लाभ अलिगडलाही होऊ शकतो. आज देशात बंगलुरू, चेन्नाइ आणि अहमदाबादची चर्चा होते पण उत्तरप्रदेशची कधीच होत नाही. स्वार्थी राजकारण्यांमुळे उत्तरप्रदेशला देशात महत्वाचे स्थान मिळू शकले नाही. या राज्याला हे स्थान देण्याचा आपला प्रयत्न आहे असे ते म्हणाले.