इस्लामाबाद – आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तान सरकारने आपल्या नागरीकांकडील दडवलेल्या संपत्तीवरील कर वसुलीचा नवीन मार्ग जनतेला उपलब्ध करून दिला आहे. त्यात येत्या 30 जून पर्यंत आपल्याकडील बेहिशोबी संपत्ती जाहीर करणाऱ्या नागरीकांना कोणतीही शिक्षा केली जाणार नाही फक्त त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीवर काही प्रमाणात दंड व कर आकारणी करून त्यांना माफी दिली जाणार आहे. सर्व संबंधीत नागरीकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली संपत्ती जाहीर करावी असे आवाहन पंतप्रधान इम्रानखान यांनी केले आहे.
या प्रकरणी त्यांनी नागरीकांना आवाहन करताना म्हटले आहे की पाकिस्तानला महान राष्ट्र बनवण्यासाठी नागरीकांनी यासाठी स्वताहून पुढे येऊन सरकारला सहकार्य केले पाहिजे. आपण करच भरले नाहींत तर देशच टिकणार नाही. त्यामुळे प्रामामणिकपणे कर भरणा करण्याचे आवाहनही त्यांनी नागरीकांना केले आहे. करअभय योजनेची मुदत 30 जून पर्यंत आहे. त्यानंतर कोणतीही माफी दिली जाणार नाही याची काळजी घेण्याची सुचनाही त्यांनी केली आहे.
अशा प्रकारची अभय योजना पकिस्तानात प्रथमच राबवली जात असल्याने त्याला नागरीकांकडून प्रामाणिक प्रतिसाद अपेक्षित आहे असे ते म्हणाले. पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढला असल्याचे त्यांनी नागरीकांच्या निदर्शनाला आणून दिले. ते म्हणाले की दहा वर्षांपुर्वी पाकिस्तानवर 6 हजार अब्ज रूपयांचे कर्ज होते ते आता 30 हजार अब्जांवर गेले आहे. देशाचे एकूण उत्पन्न केवळ चार हजार अब्ज रूपये इतके असून त्यातील निम्मी रक्कम ही कर्जफेडीसाठी आणि व्याजावर खर्च होते आहे असेही त्यांनी नागरीकांच्या निदर्शनाला आणून दिले.