राहुरी विद्यापीठ: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हद्दीतील आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या चोरी करताना हटकल्याने 10 ते 15 जणांच्या जमावाने विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व त्यांच्या पथकावर कुऱ्हाडीचा दांडका तसेच दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांसह त्यांचे पथक काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास वरवंडी गावचे हद्दीत असलेल्या विद्यापीठाच्या लंगडा आंब्याच्या बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले होते. याप्रसंगी शेटे व सुरक्षा रक्षक गोरक्षनाथ भालेराव यांनी आंब्याच्या कैऱ्या चोरीला जात असताना जाब विचारला. यावरून सुरेश मुरलीधर बर्डे याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली. यानंतर बर्डे समवेत असलेले सुनिता दादु बर्डे, दादू गोविंद बर्डे, पारूबाई अरूण बर्डे, सिताबाई मुरलीधर बर्डे, अनिता सोपान गायकवाड, ज्योती सुनिल बर्डे, बन्सी मुरलीधर बर्डे, लताबाई पवार, अरूण बर्डे, सोनवणे असे एकूण 10 ते 15 महिला व पुरूषांच्या जमावाने दगडाने हल्ला चढविला.
यामध्ये सुरक्षा अधिकारी शेटे व त्यांच्या पथकाला मारहाण झाली. याबाबत पोलिस ठाण्यात सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी तक्रार दाखल केली आहे. 3 हजार 600 रूपये किंमतीचे 90 किलो लंगडा जातीचे आंब्याच्या कैऱ्या चोरताना संबंधिताना रंगेहाथ पकडल्याने हल्ला करीत चोरट्यांनी पळ काढल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ हे करीत आहेत.