नवी दिल्ली – देशात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत सन 2018 या वर्षात 5.2 टक्के इतकी वाढ झाल्याची माहिती सरकारतर्फे आज लोकसभेत देण्यात आली. त्यामुळे सरकारला मिळणाऱ्या विदेशी चलनाचेप्रमाणही 9.6 टक्क्यांनी वाढून ते 1 लाख 94 हजार कोटी रूपये इतके झाले आहे. पर्यटन राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की पर्यटन विकास ही राज्य सरकारांची जबाबदारी आहे. त्यासाठी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकार काहीं प्रमाणात निधी राज्य सरकारांना देते. त्यातून राज्य सरकारांनी पर्यटन विषयक सुविधांमध्ये वाढ करावी अशी अपेक्षा असते असे ते म्हणाले.
सन 2018 मध्ये देशात एकूण 10.56 दशलक्ष विदेशी पर्यटक भारतात आले होते. बिहार मधील नालंदा आणि बोधगया या दोन ठिकाणच्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सरकारने त्या स्थळांचा स्वदेश दर्शन योजनेत समावेश केला आहे असेही त्यांनी सांगितले.