रोज प्रत्येक 15 जणांवर कारवाईचे बंधन
टार्गेट पूर्ण न करणाऱ्यांवर उगारणार कारवाईचा बडगा
पुणे – शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे. कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर शौच करणे, लघवी करणे असे अनेक प्रकार घडत असतात. मात्र, यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. मध्यंतरी महापालिकेने पथक नेमून धडक कारवाई केली खरी; परंतु ती कमीच झाली. मात्र, स्वच्छ भारत मिशनमध्ये पुण्याचा नंबर घसरल्याने महापालिकेने वर्षाच्या सुरुवातीपासूनच यासाठी प्रयत्न सुरू केले असून, अस्वच्छता करणाऱ्या 15 जणांवर तरी प्रत्येकाने कारवाई करायचीच असा फतवा प्रशासनाने काढला आहे. जर प्रत्येकी 15 केसेस नाही केल्या तर संबंधितांवरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
पुण्याचा नंबर देशपातळीवर 36 वा फेकला गेला आहे. त्यामुळे यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. “स्वच्छ भारत मिशन’मध्ये आपला नंबर येण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तीन महिनेच शहर स्वच्छता मोहीम राबवली होती. त्या काळात अगदी आयुक्तांपासून ते अतिरिक्त आयुक्त, झोनल कमिशनर, सह आयुक्त, उपायुक्त, विभागप्रमुख, क्षेत्रीय आयुक्त, अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश करून, यांचे पथक बनवून प्रभात फेरी काढून अस्वच्छता करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम सुरू केली होती. मात्र, हे तीनच महिने असल्याने ही तात्पुरती मात्रा लागू पडली नाही. पुण्याचे रॅंकींग घसरलेच.
यंदा तसे होऊ नये यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीम करून त्यांच्याकडे कामाची जबाबदारी निश्चित केली आहे. प्रत्येकाने रोज 15 जणांवर तरी कारवाई करायची असल्याचे यामध्ये नमूद केले आहे. त्यामुळेच अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसेल, अशी प्रशासनाची समजूत आहे.
परंतु, याला रिस्पॉन्सच न मिळाल्याने आता थेट कर्मचाऱ्यांवरच कारवाई करण्यात येईल, असा फतवा विभागाने काढला आहे. जे कारवाई करणार नाहीत त्यांच्यावरच कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याचे घनकचरा विभागाचे अधिकारी माधव जगताप यांनी सांगितले.
सहा महिन्यांत 15 हजार 911 जणांवर कारवाई
शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सुरू केल्यापासून गेल्या सहा महिन्यांत तब्बल 15 हजार 911 जणांवर कारवाई करून 39 लाख 2 हजार 380 रुपये दंड वसूल केला आहे. कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली आहे. दरम्यान, घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे मोळक यांनी सांगितले.
कारवाई आणि दंड
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नोव्हेंबर 2018 पासून घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या तरतूदींचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाई अंतर्गत रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणाऱ्यास 180 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून 150 रुपये, सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर लघवी करणाऱ्याकडून 200 रुपये, सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर शौच करणाऱ्यांकडून 500 रुपये आणि कचरा जाळणाऱ्यांकडून 100 रुपये दंड वसूल केला जातो.
कोणाकडून किती आकारला दंड
मोहीम सुरू केल्यापासून 4 मेपर्यंत गेल्या सहा महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 1 हजार 565 जणांवर कारवाई करून 2 लाख 11 हजार 779 रुपये दंड वसूल केला. कचरा टाकणाऱ्या 14 हजार 78 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 34 लाख 85 हजार 201 रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या 144 जणांवर कारवाई करून 25 हजार 755 रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी शौचास बसणाऱ्या आणि सोसायटी कचरा प्रकल्प बंद ठेवणाऱ्या 39 जणांवर कारवाई करून 1 लाख 69 हजार 295 रुपये दंड वसूल केला आहे. तर 85 पानपट्टींवर कारवाई करून 10 हजार 350 रुपये दंड वसूल केला आहे.