भारताची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचा युनूस यांचा दावा
नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारकडून देशाला आर्थिक मंदीच्या दरीतून वर काढण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठी नुकतेच गृहनिर्माण, वाहन आणि बॅंकिंग क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अलीकडेच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. परंतू, बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था चिंताजनक असल्याचे मोठे विधान केले आहे.
भारताच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना महंमद युनूस यांनी भारतात अस्थिर वातावरण आहे आणि लोक अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात असे म्हटले आहे. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत महंमद युनूस यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर वक्तव्य केले आहे. “भारतात काय चालले आहे हे मला माहित नाही, परंतु देशातील अनिश्चिततेचे वातावरण असते तेव्हा सैद्धांतिकदृष्ट्या लोक गुंतवणूक करण्यास संकोच करतात असे त्यांनी म्हटले. तसेच मुहम्मद युनूस यांच्या मते गुंतवणूकदार देशाच्या धोरणात मोठा बदल होण्याची वाट पाहत आहेत. जेथे समस्या असेल तेथे तो कोणताही निर्णय घेत नाही. यामुळेच भारतात आर्थिक मंदीसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचेही युनुस यांनी म्हटले आहे.