जिल्हा परिषद, पंचायत समितीचे दुर्लक्ष
वाल्हे – येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायकवाडवाडी (ता.पुरंदर) शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. इमारतीचे छत कधीही कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाल्हे ग्रामपंचायतीने शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी पंचायत समितीकडे केली होती, परंतु पंचायत समितीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांनी जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.
साधारण तेरा वर्षा पूर्वी गायकवाडवाडी शाळेच्या इमारतीचे बांधकाम केले होते. या शाळेत पंधरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्या शाळेतील चारही इयत्तेचे वर्ग एकाच वर्ग खोलीत बसत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेची ऑनलाईन माहिती युडीसी मार्फत भरली जाते. त्यामध्येही दरवर्षी खोली दुरुस्तीचा उल्लेख केलेला असतो. तरीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून कसलीही कार्यवाही केली जात नाही. एकीकडे एखाद्या शाळेला गरज नसताना निधी दिला जातोय तर दुसरीकडे निधी मागितला तरी वर्षानुवर्षे निधी दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.
वाल्हे ग्रामपंचायतीने एक वर्षापूर्वी शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती, परंतु पंचायत सामितीने याला केराची टोपली दाखविली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर शाळेला निधी उपलब्ध द्यावा, अशी मागणी शिक्षक, शाळा व्यवस्थापण समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.